शबनम न्युज | मुंबई
शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा आयोजित करण्यास उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गटांपैकी कोणत्याही एका गटास परवानगी दिली तर शिवाजी पार्क सारख्या संवेदनशील परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अभिप्राय शिवाजी पार्क पोलीस ठाण्याने दिल्याने मुंबई महापालिकेने दोन्ही गटांचा अर्ज बुधवारी फेटाळल्याची माहिती गुरुवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली.त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने पालिकेच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी न्यायालयाकडून मागितली. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी आता शुक्रवारी ठेवली आहे. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी आता शुक्रवारी ठेवली आहे.
१९६६ पासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो आणि पालिकेने परवानगीही दिली आहे, असे शिवसेनेने याचिकेत म्हटले आहे. गुरुवारच्या सुनावणीत उद्धव ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील ऍस्पि चिनॉय यांनी न्यायालयाने सांगितले की, आमचा अर्ज पालिकेने फेटाळल्याची माहिती आम्हाला आत्ता मिळाली.दोन्ही परस्परविरोधी अर्जदारांनी शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्याची परवानगी मागितली आहे. कोणत्याही एका अर्जदारास परवानगी दिली तर शिवाजी पार्क सारख्या संवेदनशील परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा अभिप्राय शिवाजी पार्क पोलीस ठाण्याने दिल्याने आपल्या अधिकारांचा वापर करून अर्ज नामंजुर करत असल्याचे उपयुक्तांनी म्हटले. पालिकेच्या या आदेशाला आव्हान द्यायचे आहे. कारण आम्हाला दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी देणे बंधनकारक आहे, असे चिनॉय यांनी म्हणत याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी देण्याची विनंती न्यायालयाला केली.