शबनम न्युज | पुणे
निसर्गाने मानवाला पंचेंद्रिय दिलेली आहेत. पण त्याहून आणखी एक महत्त्वाचे सहावे इंद्रिय आहे ते म्हणजे आपले मन. आपल्या मनाची ताकद जेव्हा ध्येयावर केंद्रित होते, त्यावेळी शरीर व बुद्धीचा विकास होतो. त्यातून व्यक्तिमत्व विकसित होते. जीवन जगताना आपले सकारात्मक मानसिकतेतून आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन इस्कॉन खराडी पुणेच्या भक्ति क्लबचे प्रमुख अध्यात्मिक गुरु सनातन धर्म प्रभू यांनी केले.
मराठवाडा मित्र मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत ‘मनाची एकाग्रता व व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर धर्म प्रभू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रमेश पंडित, इस्कॉन कोंढवा केंद्रातील विजय कृष्ण प्रभू व जेष्ठ गुरुवर्य प्रा. सुभाष पत्की उपस्थित होते.
सनातन धर्म प्रभू म्हणाले, “मनाच्या एकाग्रतेसाठी ध्यानधारणा, मंत्रोच्चार आवश्यक आहे. आपली मानसिकता ही सकारात्मक असायला हवी. शिक्षण, नोकरी अथवा व्यवसाय करताना त्याला अध्यात्माची जोड दिल्यास आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो.”
“आध्यात्मामुळे जीवनाचा परम अर्थ समजतो. ज्याला हे समजते त्याचे जीवन समृद्ध होते. अध्यात्म म्हणजे स्वतःकडे बघणे आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य वेळ वापर करावा. त्याचा अतिवापर विद्यार्थ्यांना विनाशाकडे घेऊन जाऊ शकतो, असे विजय कृष्ण प्रभू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
प्रा. सुभाष पत्की व प्रा. रमेश पंडित यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. राजेंद्र खजुरे, सुनील पवार व प्रा. के. बी. पवार यांनी केले. ज्येष्ठ शिक्षिका डॉ. सुजाता शेणई यांनी सूत्रसंचालन केले.