शबनम न्युज | पुणे
‘राष्ट्रवादाला उग्र वादाकडे नेण्याऐवजी विश्ववादाकडे जाण्याचा स्वामी विवेकानंद यांचा संकल्प होता. उपासनाधर्माकडून विश्वधर्माकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ही विश्वबंधुत्वाची संकल्पना वेदांतामधून आली . युवकवर्गच ही संकल्पना साकार करतील, हा विश्वास विवेकानंदांना होता.
‘तत्वज्ञान हा सर्वांना जोडणारा पूल आहे ,अशी विवेकानंदांची धारणा होती. तत्वज्ञान आणि विज्ञान सोबत घेऊन पुढे जावे , असे त्यांना वाटत होते. हे विचार आजच्या युवकांनाही दिशादर्शक आहेत ‘,असे प्रतिपादन ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.
विश्वबंधुत्व दिन निमित्त विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या पुणे शाखेने आयोजित केलेल्या ‘स्वामी विवेकानंदांचे विश्वबंधुत्व आणि आजचा युवक’ या विषयावरील डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या व्याख्यानाला गुरुवारी चांगला प्रतिसाद मिळाला. हे व्याख्यान गुरुवार, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता बाल शिक्षण मंदिर सभागृह ,मयूर कॉलनी( कोथरूड )येथे झाले. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी पुणे शाखेचे संचालक जयंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. विवेकानंद केंद्राच्या प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वामी विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील व्याख्यानात ‘माझ्या बंधू आणि भगिनींनो ‘या शब्दांनी संपूर्ण विश्वातील मानवतेला साद घातली होती. हा दिवस विवेकानंद केंद्रामध्ये ‘विश्वबंधुत्व दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून हे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
डॉ. नाडकर्णी म्हणाले, ‘ अवकाशात विरून न जाता इतिहासात नोंदले जातात त्यांना श्रुती म्हणतात. ती आपोआप स्मृतीत राहतात.विवेकानंद यांचे बंधुत्वाचे शब्द हे विश्वबंधुत्वाचे ठरले.
जगाला उद्देशून केलेले संबोधन सच्चे आणि पारदर्शक होते. त्यांचे विश्वबंधुत्वाचे संबोधन हे अद्वैतवादी होते.
रामकृष्ण यांच्याकडे असलेली आस्था स्वामी विवेकानंद यांच्यात आल्याने त्यांची भावनिक वादळे स्थिरावली.सेवाभाव हा आत्मा स्वामी विवेकानंदांकडे आला. आस्था,सेवा आणी करुणा यात स्वामी विवेकानंदांच्या विश्वबंधुत्वाची त्रयी आहे.
विवेकानंदांचा विश्वधर्म हा समन्वयाचा आहे. समन्वय आणि समतेवर आधारित संस्कृती यावी, यासाठी स्वामीजी प्रयत्नशील होते, असेही डॉ.नाडकर्णी यांनी सांगीतले.