शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याचे स्वागत करून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आत्मविश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, काल बीकेसीमध्ये शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट गर्दी होती, काल मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले कि खरी शिवसेना कोणाची आहे. या बद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. यावेळी त्यांनी ‘भगवा’ आणि ‘खऱ्या शिवसेनेच्या’ विजयावरही प्रकाश टाकला.
ते पुढे म्हणाले, विधानसभेवर भगवा असेल पण तो भगवाच खऱ्या शिवसेनेचा म्हणजेच शिंदे गट आणि भाजप युतीचा भगवा असेल, यावेळी बोलताना फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना संरक्षण दिल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ठाकरेंनी मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना पाठिंबा दिला, सावरकरांना दररोज वाईट म्हणणाऱ्यांना सोबत घेतले आणि म्हणूनच ते असे प्रसंग पाहत आहेत.
तत्पूर्वी, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले होते कि, “मला फक्त एकच राग येतो की, जेव्हा मी रुग्णालयात दाखल होतो, तेव्हा मी ज्यांना राज्याची जबाबदारी दिली होती, ते लोक ‘कटप्पा’ झाले आणि आमचा विश्वासघात केला. ते विचार करत होते की मी हॉस्पिटलमधून परत येणार नाही. या वक्तव्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, कटप्पालाही स्वाभिमान आहे आणि त्यांना दुटप्पीपणा नाही. “ते मला ‘कटप्पा’ म्हणतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ‘कटप्पा’ लाही स्वाभिमान होता आणि तुमच्यासारखा दुटप्पीपणा नव्हता,” असे शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हयात असते तर नारायण राणे मुख्यमंत्री झाले असते. बाळासाहेब ठाकरे हयात असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, बाळासाहेबांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री केले असते”, असे वक्तव्य काल मुख्यमंत्र्यानी दसरा मेळाव्यात व्यक्त केले.