शबनम न्युज | पुणे
ज्येष्ठ कादंबरीकार आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांनी संपादित केलेल्या ‘आंतरभारती’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन लेखिका आणि मानवी हक्क कार्यकर्त्या डॉ.समिना दलवाई(सोनपत) यांच्या हस्ते झाले.शुक्रवार,दि १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता एस एम जोशी सभागृह(नवी पेठ,पुणे) येथे हा कार्यक्रम झाला.एमकेसीएल फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ विवेक सावंत हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यंदाचा आंतरभारती दिवाळी अंक हा ‘स्वातंत्र्य , समता आणि बंधुता विशेषांक’आहे.त्यामुळे ‘स्वातंत्र्य,समता आणि बंधुता’ या संवैधानिक मूल्य त्रयींवर डॉ.समिना दलवाई,डॉ.विवेक सावंत या मान्यवरांची व्याख्याने या प्रकाशन समारंभात झाले.अमर हबीब (राष्ट्रीय सचिव आंतर भारती),डॉ.नितीश नवसागरे,डॉ.श्रुती तांबे,डॉ.डी.एस.कोरे,अंजली कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन अंजली कुलकर्णी यांनी केले.डॉ डी एस कोरे यांनी आभार मानले.
डॉ दलवाई म्हणाल्या,’आज निराश होणं किंवा नकारात्मक राहून, अन्यायाला घाबरून बघ्याची भूमिका घेणं ही खरंतर चैन ठरेल, कारण मला काय घेणं आहे, माझं बरं चाललं आहे, मी आजूबाजूला चाललेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करेन हे असे बघे लोक आणि या प्रश्नांपासून दूर पळणारेच अशी भूमिका घेऊ शकतील.त्यामुळे मला असे वाटते की ज्या अशिक्षित महिला असूनही आम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारच असे म्हणतात, आणि तशी ठाम भूमिका घेत कृतीशीलपणे लढा उभारतात, त्याच खरेतर समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्य मूल्यांच्या खऱ्या वारसदार ठरता त.
डॉ दलवाई पुढे म्हणाल्या,’आर्थिक नाड्या ज्यांच्या हातात असतात त्यांच्या नुसार न्यायव्यवस्थाही बदलत असते, त्यामुळे एका बाजूला बिभत्स भांडवलशाही अर्थव्यवस्था निर्माण होत आहे ! आणि आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते आहे.भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळेच टीव्ही मालिकांतूनही सांस्कृतिक प्रदूषण पसरवून स्त्रीयांना भोगवादी विचारसरणीचा मारा केला जात आहे‘.
डॉ.विवेक सावंत म्हणाले, ‘महात्मा गांधी यांनी प्रथम भारतात स्वातंत्र्य लढ्यापासूनच महिलांना समता बंधुत्व आणि स्वातंत्र्य यांचे हक्क मिळवून द्यायला सुरुवात केली. “मी चंपारण्याला एका अटीवर येईल, जर या लढ्यात महिला सहभागी होणार असतील!”,असे ते म्हणाले होते. आज त़ंत्रज्ञानाने आपले वैयक्तिक, वैचारिक स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे, ज्याच्या ताब्यात जास्त डाटा, त्याच्याकडं स्वातंत्र्य आपण गहाण टाकलं आहे. तंत्रज्ञानाने केवळ मोबाईल, इमेल, संगणक, बँक अकाऊंट, हॅक होत नसून आज माणूस आणि माणसाचा मेंदू आणि त्याचं वैचारिक स्वातंत्र्य हॅक केले जाते आहे.’
डॉ लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले,’आज देशात विखारी वातावरण निर्माण झाले असल्याने, मैत्री भावाची कधी नव्हे ती प्रचंड उणीव निर्माण झाली असून लोक एकमेकांचा द्वेष करू लागले आहेत. त्यामुळे आज स्वातंत्र्य, समता, बंधुत्व मूल्य जपण्याचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवते आहे. याच विचाराने यंदाचा दिवाळी अंक स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या विषयावर काढण्यात आला आहे’.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाबाबत आज कोणालाही तटस्थपणाची भूमिका घेणं परवडणार नाही, तेव्हा प्रत्येकाने आपापल्या परीने, आपापल्या क्षमतेने, आपापल्या क्षेत्रात अन्यायाविरुद्ध आवाज उठविला पाहिजे, आणि खर्या अर्थाने समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्य मूल्य कृतीतून जगण्याला आणि जागृतीला स्वतः पासून सुरुवात केली पाहिजे,असेही डॉ.देशमुख म्हणाले
प्रबोधनपर वैचारिक दिवाळी अंक
‘आंतर-भारती’ या दिवाळी अंकाचे हे चौथे वर्ष आहे .आंतरभारती ही पूज्य साने गुरुजींच्या विचारांवर आधारित राष्ट्रीय एकात्मता , भारताची बहू धार्मिकता , बहू सांस्कृतिकता , बहू भाषिकता , बंधुता व सहिष्णुता जोपासण्यासाठी आणि प्रबोधनासाठी गेली पन्नास वर्षे काम करणारी स्वायत्त संस्था आहे . प्रबोधनपर वैचारिक दिवाळी अंक ही आंतरभारती दिवाळी अंकाची आता सर्वमान्य व सर्वज्ञात ओळख बनली आहे .
मागील ७५ वर्षांत भारतीय नागरिकांना, खास करून दलित , वंचित , महिला व अल्पसंख्यांकांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यत्रयीचा किती लाभ झाला ? प्रत्येकाला खरे स्वातंत्र्य , खरी समता किती मिळाली ? समाजात बंधुता कितपत रुजली ? या साऱ्या प्रश्नांचा वेध घेणारे व या मूल्यत्रयीचे तत्त्वज्ञान , संकल्पना आणि संविधानिक महत्त्व उलगडून टाकणारे वैचारिक लेख ,मुलाखती व परिसंवाद यांनी हा अंक संपन्न आहे . वाचकांना नवे मूल्यभान देणारा हा अंक आहे,असे डॉ लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले.