शबनम न्युज | पुणे
“मानवतावाद हा पत्रकारितेचा गाभा असायला हवा. मात्र, आज बाजारीकरण, उथळपणाला अधिक महत्व दिले जात आहे. परिणामी, माध्यमांवरची विश्वासाहर्ता कमी होत आहे. सामान्य माणसाचा, दुःखितांचा, कष्टकऱ्यांचा कळवळा माध्यमांना असला पाहिजे. माणूसकेंद्री, सकारात्मक व आश्वासक पत्रकारितेची गरज आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व लेखक विजय कुवळेकर यांनी केले.
विजय कुवळेकर म्हणाले, “पत्रकार हा लेखक असायला हवा. ललितलेखनाची गोडी असेल, तर चाकोरीबाहेरचे विषय आपल्याला मांडता येतात. पुरोगामी-प्रतिगामी असा शिक्का मारून माणूस कधीच समजत नाही. विचारांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. नैतिकता जपत निर्मोही व लोकानुरंजनाची पत्रकारिता व्हावी. लढवय्यी वृत्ती न सोडता नव्यातील चांगले टिपून त्याचा समाजहितासाठी उपयोग कसा करता येईल, याचा विचार पत्रकार, लेखकांनी करायला हवा.”
विजय चोरमारे म्हणाले, “पत्रकारितेला भांडवली स्वरूप प्राप्त झाले आहे. तत्वनिष्ठ पत्रकारिता संग्रहालयात ठेवावी, अशी आजची स्थिती आहे. अलीकडच्या काळात बाजारव्यवस्थेशी तडजोड करून काम करण्याची वेळ संपादकांवर आली आहे. माध्यमे प्रबोधनाचे काम करतात की मार्केटिंगचे हेच कळत नाही. आज वार्तामूल्य हरवलेल्या काळात छोटी माणसे मोठी करून दाखवली जातात. पत्रकारितेतील उपक्रमशीलतेचे बाजारीकरण दुर्दैवी आहे. जोंधळे यांच्या पुस्तकातून पत्रकारितेचा इतिहास गुणदोषांसाहित अधोरेखित झाला आहे.”
अरविंद गोखले म्हणाले, “पत्रकारितेला ‘गिव्ह अँड टेक’ची सवय लागली आहे. स्पष्टपणे लिहिणाऱ्या पत्रकारांची वानवा आहे. समाजाच्या हितासाठी चांगले आणि स्पष्ट लिहिण्याची गरज आहे. कटुता येण्याच्या भीतीने अनेकजण लिहिण्याचे टाळतात.”
अरविंद पाटकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. आसावरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.