शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट आहे. तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दर सोमवारी सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभांचे आयोजन सुरु केले आहे. राजेश पाटील यांच्यानंतर आलेले आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी देखील जनसंवाद सभा सुरु ठेवली आहे. या जनसंवादसभांमध्ये आतापर्यंत नागरिकांनी हजारो नागरी समस्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत. या प्रशासकीय काळात अनेक विकासकामे ठप्प झाली असून प्रशासन सुस्त झाले आहे. प्रशासनाच्या कामकाजाचा वेग वाढावा आणि नागरी समस्यांचा निपटारा व्हावा, यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी संपुर्ण शहराचा प्रभागनिहाय दौरा करावा तसेच आतापर्यंत जनसंवाद सभांमध्ये दाखल झालेल्या नागरी समस्यांचा आढावा घेऊन आकडेवारी जाहिर करावी. तसेच सुस्त झालेल्या प्रशासनाला गतीशील आणि कृतीशील करुन नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी केली आहे.
सचिन साठे यांनी सोमवारी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्ष ॲड. अनिरुध्द कांबळे, महाराष्ट्र
प्रदेश युवक कॉंग्रेस माजी सरचिटणीस मयुर जयस्वाल, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सचिव गौरव चौधरी, मकरध्वज यादव यांच्या समवेत आयुक्तांना लेखी पत्र दिले. यावेळी आयुक्तांनी देखील साठे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. आयुक्तांना दिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे कि, शहरात पाणीपुरवठा, रस्त्यांची व सिमेंट रस्त्यांची विकासकामे, वाहतुक समस्या, पदपथ, पथदिवे, ड्रेनेज, उद्यान, मनपा शाळा, अतिक्रमणे अशी अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. यावेळी शहरातील विविध विकासकामांचा आयुक्तांनी पाहणी दौरा करावा. आपण स्वतः देखील जनसंवाद सभांमध्ये उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घ्या. लोकप्रिनिधींकडून अपेक्षित असणारा शहराचा विकास झाला नाही, प्रशासक राजवटीत प्रशासन सुस्त झाले आहे. या प्रशासनाला वेग देवून नागरिकांना दिलासा द्यावा अशीही मागणी सचिन साठे यांनी या पत्राद्वारे केली आहे.