शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल संतापजनक वादग्रस्त विधान केले. या वादग्रस्त विधाना विरोधात संपूर्ण राज्यात निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नसून त्यांनी अशी विधाने टाळली पाहिजे, तसेच राज्यपालांना होत असलेला विरोध राजकीय असल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना आठवले म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील प्रेरणास्थान होतेच, आजही ते सर्वांचे प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. त्यामुळे राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मात्र, त्यांच्याविरोधात जे आंदोलन सुरू आहे ते राजकीय आहे. राज्यपालांसारख्या व्यक्तीचा अशा प्रकारे अवमान करणे योग्य नाही, असेही यावेळी रामदास आठवले म्हणाले.