कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यांचा अजित पवारांनी केला तीव्र निषेध
शबनम न्युज | मुंबई
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची गेले दोन दिवस जी काही वक्तव्य येत आहेत, त्याबाबत राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र निषेध व्यक्त करत तुम्ही महाराष्ट्र मागायला निघाले आहेत का, त्यांना काय महाराष्ट्र असा-तसा वाटला का? असा संतप्त सवाल केला आहे.
ते म्हणाले, वास्तविक काही कारण नसताना त्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांबद्दल वक्तव्य केले आणि त्याच्यावर आज सोलापूर जिल्ह्यातील अक्कोलकोट तालुक्यातील गावांबद्दल वक्तव्य केले. सातत्याने बघतोय की, काहीही कारण नसताना अशा प्रकारची वक्तव्य करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबतीत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक भाषेत प्रत्युत्तर दिले पाहिजे, अशी ठाम भूमिका राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालय येथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री भाजपाचे आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भाजपाचे आहेत. यापूर्वीच्या सरकारच्या काळात अशी वक्तव्य होत नव्हती. आता फक्त मुंबईच मागायची बाकी राहिली आहे की काय कळत नाही. महाराष्ट्रातील जनता हे कदापि सहन करणार नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणाच्या भानगडीत पडू नये, अशा इशाराही अजित पवार यांनी यावेळी दिला. केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा. सीमाप्रश्नाबाबत सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू आहे. याबाबत सुप्रीम कोर्ट भूमिका मांडेल आणि महाराष्ट्र राज्यही आपली भूमिका मांडेल आणि त्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी होईल. परंतु अशा प्रकारचे कधी राज्यातील जत तालुक्यातील गावांबाबत तर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटाबाबत विधान करायची हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब थांबवले पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
लोकांचे लक्ष बेरोजगारी व महागाईवरून हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले आहे हे तपासण्याची वेळ आलेली आहे. याबाबत राज्य सरकारने ताबडतोब राज्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी आग्रही भूमिका अजित पवार यांनी मांडली.