संपादकीय
आज रामदेव बाबा यांनी महिलांसंबंधी अत्यंत संतापजनक वक्तव्य केले. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. पतंजलीच्या मोफत योग शिबिरात असे वक्त्यव्य करून त्यांनी सर्वच महिलांचे अपमान केले. त्यांच्या या वक्तव्याचा अनेकजण निषेध करत आहे. महिलांसंबंधी असे घाणेरडे वक्तव्य करण्यास त्यांना कसे काही वाटले नाही? असा प्रश्न महिलांकडून उपस्थित होत आहे. त्यांच्या मते, त्यांच्या दृष्टिकोनातून महिला त्यांना काही न घालता छान दिसतात, असे बोलून त्यांनी त्यांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन स्पष्ट केला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला त्यांच्या सोबत व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदें उपस्थित होते. त्यांनी देखील यावेळी या वक्तव्याचा विरोध केला नाही. या घटनेतून भाजप पक्षाची ही प्रतिमा मलीन होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. म्हणजे याचा अर्थ काय? या लोकांना महाराष्ट्रातील महिलांचा अपमान करण्यात आनंद मिळतो का? वारंवार हे महिलांविषयी असले वक्त्यव्य करून महिलांचा अपमान का करतात.
महिलांविषयी असे आक्षेपार्ह वक्तव्य करून यांना काय सिद्द करायचे आहे? वारंवार कोणी ना कोणी महाराष्ट्रातल्या महिलांविषयी असे वादग्रस्त वक्त्यव्य करून अपमान करीत आहे. महिलांचा सन्मान करणे हि महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण महिलांना काली दुर्गा, लक्ष्मी अशी देवींची उपमा देत असतो, यानिमित्ताने सर्व महिला जातींचे आपण पूजन करतो, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ही संस्कृती आपण जपलीच पाहिजे, महिलांना मान सन्मान व योग्य दिशा मिळाली तर महिला या विकासाचा पाय भक्कम करणाऱ्या ठरल्या आहेत. अनेक क्षेत्रात महिला या सक्षम झाल्या आहेत, महिलांचा मानसन्मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. या कर्तव्याला बाधा न आणता रामदेव बाबा सारख्या प्रतिष्ठित व्यक्तींनी वागले पाहिजे, पण आपले दुर्देव…अशी नीच प्रवृत्तीची माणसे आपल्या समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरत आहे. अशा लोकांचा वेळीच जागेवरच अपमान करायला हवा. परंतु असे आज झाले नाही, अशा नीच प्रवुत्तीना ठेचून काढायला हवे, तरच समाजात महिलांना सन्मानाने पाहिले जाईल.
शेकडो वर्षांपूर्वी महिलांना मान सन्मान दिला जात नव्हता. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींच्या शिकवणीमुळे महिलांचा मान सन्मान समाजात होऊ लागला. परंतु काही समाज अजूनही महिलांना सन्मानाने वागवणूक देताना दिसत नाही, असे यानिमित्ताने दिसून आले. महिलांमध्ये आपण आई, बहीण असे अनेक नाते पाहतो. अशा नात्यांचा सन्मान करायचा असतो. हे नामदेव बाबा विसरले. राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण, रुपाली ताई ठोंबरे यांनी वेळीच रामदेव बाबाच्या या विधानाचा समाचार घेतला. परंतु तेथे समक्ष उपस्थित असलेल्या अमृता फडणवीस यांनी रामदेव बाबांच्या या विधानावर हसून एक प्रकारे त्यांच्या दृष्टीकोनाला मूक संमती दिली.
महिलांचा अपमान करणारे हे कोणीही असो, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हायलाच हवी, मग ते अब्दुल सत्तार असो वा रामदेव बाबा. मगच अशा वारंवार घडणाऱ्या घटनांना आळा बसेल.