शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे येथे राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त ” भारतीय संविधान : मूल्य शिक्षणाचा एक स्त्रोत ” आणि मतदार नोंदणी प्रक्रिया या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन व स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. माणिक कसाब प्रमुख- राज्यशास्त्र विभाग यांनी कार्यक्रमाचा उद्देश आणि भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क, कर्तव्य व मार्गदर्शक तत्वे भारतीय नागरिकांसाठी कसे महत्वाचे आहेत या संदर्भात थोडक्यात विवेचन केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. कैलास अस्तरकर प्रमुख- कला शाखा व कार्यक्रम अधिकारी- रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी यांनी करून दिला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे, डॉ. मारुती गवलवाड सहाय्यक प्रा.राज्यशास्त्र विभाग, महात्मा फुले महाविद्यालय, मुखेड जि.नांदेड यांनी “भारतीय संविधान : मूलभूत शिक्षणाचा एक स्त्रोत ” या विषयावर भाष्य करतांना भारतीय राज्यघटनेचा इतिहास सविस्तर मांडला तसेच भारतीय संविधान हे देशाच्या परिस्थितीला कसे अनुरूप असून अहिंसक क्रांतीचा दस्तऐवज म्हणजे राज्यघटना असे मत व्यक्त केले. भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला राजा होण्याची कशी संधी दिली आहे या बाबत मत मांडून संविधान निर्मितीच्या अगोदर माणसा माणसात जातीवरून विभागणी होती तर संविधानाने माणसा माणसात बौद्धिकते वरून कसे वर्गीकरण केले हे विविध उदाहरणांचे दाखले देत स्पष्ट केले. संविधानापूर्वीची सामाजिक,राजकीय व आर्थिक परिस्थिती कशी होती त्यात संविधानानंतर कसा बदल झाला, संविधानातील मूल्य मानवी जीवनासाठी कसे उपयुक्त आहेत या संदर्भातील सविस्तर लेखाजोखा मांडला.मा.श्री. ताटे तहसील कार्यालय भोसरी यांनी विशेष नव मतदार नाव नोंदणी व आधार लिंक या संदर्भात नव मतदारांनी आपली ऑनलाईन मतदान नाव नोंदणी कशी करावी आपला पत्ता व आडनाव कसे बदलावे यासंदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी, भारतीय संविधानाची व्यक्तीच्या जीवनातील उपयोगिता व महत्त्व सांगून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहितांना कशा इतर देशाच्या राज्यघटनेचा कसा तुलनात्मक अभ्यास करून त्यातील महत्त्वपूर्ण मूल्य भारतीय राज्यघटने कसे समाविष्ट केले याबाबत सविस्तर विवेचन करीत संविधानाच्या माध्यमातून बहुजन समाजाला कशी समता मिळवून दिली तसेच संविधानात कामगार,महिला यांच्यासाठी भविष्य निर्वाह निधी, भत्ते,प्रसूती रजा याची कशी तरतूद केली या संदर्भात मार्गदर्शन केले. देशातील कोणतीही संस्था चालवण्यासाठी जशी नियमावली लागते त्याचप्रकारे देश चालवण्यासाठी सुद्धा काही नियमावली लागते ती नियमावली म्हणजेच भारतीय राज्यघटना होय असे मत व्यक्त केले. भारतीय संविधानात कसा मानवी मूल्यांचा समावेश असून प्रत्येकाला कौशल्य विकसित करण्याचे स्वातंत्र्य कसे बहाल झाले आहे केले यावर भाष्य केले. या प्रसंगी संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी, मा. मयुर ढमाले, खजिनदार, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाला प्रा. संजीव कांबळे कार्यक्रम अधिकारी – रा.से.यो. , प्रा. शाहूराज येवते प्रमुख- विद्यार्थी कल्याण विभाग, प्रा. शैला वाळुंज,प्रा. डॉ. छाया जोशी,प्रा. डॉ. रणजित कदम, प्रा. विश्वनाथ व्यवहारे, प्रा. डॉ. राजू शिरसकर प्रा.प्रेरणा पाटील,प्रा.सोनाली अभंग,प्रा. सविता मानके,प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. दिपाली ताम्हाणे,प्रा. सोनाली तापकीर, प्रा.प्रियंका जाधव, मा. श्री. प्रवीण भावे कार्यालयीन अध्यक्ष, सौ. वर्षा ताजणे, श्री सुशेन राठोड,श्री. वैभव बडवे श्री श्रीकांत कांबळे इत्यादी सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रा. परमेश्वर भताशे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. यशोदा खुळखुळे यांनी मानले. विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.