शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
राष्ट्रीय वीरांची बदनामी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार उदयनराजे भोसले यांनी आज घेतला.
ते म्हणाले कि, जे लोक राष्ट्र विरोधी कारवाया करतात, त्यांच्यावर देशद्रोहाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जातो. त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रीय वीरांची बदनामी करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्याखाली शिक्षा व्हायलाच हवी. राज्यपालांच्या वक्तव्यावरून असे दिसते की आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची फॅशन झाली आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर आपण सर्वांना संघटित व्हावे लागेल, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान होतो, तो दिवस पाहण्यापेक्षा मला मृत्यू आली असती तर बरे झाले असते, असे बोलत उदयनराजे भोसले यांना अश्रू अनावरण झाले नाही.
पुढे ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर तुम्ही कारवाई करू शकत नसाल तर तुम्हाला राजाचे नाव घेण्याचा अधिकार नाही. निवडणुका आल्या की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता, पण जेव्हा त्यांचा अपमान होतो तेव्हा तुम्ही गप्प बसता, अशावेळी प्रत्येक राजकीय पक्षाने निर्णय घ्यायला हवा, असेही उदयनराजे भोसले यांनी सांगितले.