शबनम न्युज | मुंबई
राज ठाकरे यांनी केलेले आरोप धादांत बिनबुडाचे आहेत. त्याला काही अर्थ नाही. आदरणीय शरद पवार साहेबांचे नाव घेतले की ती बातमी होते. राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे योग्य वाटत नाही. हेच राज ठाकरे जेव्हा पवार साहेबांची मुलाखत घेत होते तेव्हा काय बोलत होते, असा सवाल करत इतकं दुटप्पी माणसाने वागू नये, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
पवार साहेबांना उभा महाराष्ट्र ५५ वर्षे ओळखतो आहे. ५५ वर्षे ते राजकारण करत आहेत. पवार साहेबांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार नेहमी डोळ्यासमोर ठेवले. तशाच पद्धतीने सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचे काम त्यांनी केले. वास्तविक राज ठाकरे यांनी हा आरोप करणे म्हणजे हास्यास्पद आहे. त्याच्या तसूभर देखील तथ्य नाही. नखभर देखील तथ्य नाही, असे अजित पवार म्हणाले.