उद्धव ठाकरेंनी मानले उदयनराजेंचे खास आभार !
शबनम न्युज | मुंबई
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी भगत सिंह कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली होती. त्यांनतर आज राज्यपालांच्या विरोधात किल्ले रायगड येथे ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उदयनराजेंनी राज्यपालांवर निशाणा साधला. यांनतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील उदयनराजेंचे खास आभार मानत, “चांगलं सांगून राज्यपाल जात नसेल तर महाराष्ट्र काय आहे हे दाखवण्याची वेळ आली आहे”, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
ठाकरे म्हणाले, उदयनराजे यांना मी खास धन्यवाद देईल. या मुद्द्यावर भाजपामधील सुद्धा छत्रपती प्रेमी एकत्र यावेत. तशी सुरुवात झाली आहे. आम्ही अवधी दिला होता. चांगलं सांगून राज्यपाल जात नसेल तर महाराष्ट्र काय आहे दाखवण्याची वेळ आली आहे, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. यावेळी ठाकरेंनी अनेक मुद्यांवर भाष्य केले.
दरम्यान, आज झालेल्या निर्धार शिवसन्मानाचा मेळाव्यात बोलताना, उदयनराजे भोसले यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याची घोषणा देखील केली आहे. या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.