नागपूर : शबनम न्यूज ( वृत्तसंस्था )
कोरोना विषाणू चे रुग्ण पुन्हा आढळून येत आहेत की सह अन्य काही देशात रुग्ण आढळून आले आहेत या पार्श्वभूमीवर राज्यात कृती दल गठित करून केंद्र सरकारबरोबर समन्वय ठेवत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. दरम्यान राज्यात पुन्हा मास्क वापरणे सक्तीचे करायचे की नाही त्यावर गुरुवारी निर्णय घेण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.
विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉइंट ऑफ इन्फर्मेशनचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. सध्या चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून तेथे रुग्ण दाखल करून घ्यायला हॉस्पिटल शिल्लक राहिलेली नाहीत. तेथे कारमध्येच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार झाला असून आपल्याकडे ती परिस्थिती निर्माण होऊन पुन्हा राज्य ठप्प होऊ नये म्हणून राज्य सरकारने आतापासून जागे व्हावे. त्यासाठी एखादी समिती अथवा कृती दल गठित करावा, असे अजित पवार यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले की कोरोना विषाणूच्या परिस्थितीवर राज्य शासन लक्ष ठेवून आहे. कृती दल गठित करून आणि केंद्र सरकारबरोबर समन्वय ठेवत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येईल.
केंद्राच्या सूचनेनंतर राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली. नव्या व्हेरियंटचे चार रुग्ण देशात आतापर्यंत आढळले असले तरी महाराष्ट्रात या व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. आरोग्य विभागाला अलर्ट जारी केला आहे. लसीकरण, डॉक्टर, औषधा संदर्भात सूचना दिल्या आहेत, असे सावंत म्हणाले. सध्या मास्क सक्ती नाही मात्र केंद्राचा अलर्ट पाहता मास्क सक्ती करायची की नाही याबाबत गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही सावंत यांनी स्पष्ट केले.