शबनम न्युज | पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बुधवार (दि. २८) रोजी पुणे शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त शरद पवार यांनी काँग्रेस भवनला भेट दिली. यावेळी सोहळ्यात बोलताना “‘काँग्रेस-मुक्त भारत’ असू शकत नाही. देशाला पुढे न्यायचे असेल तर काँग्रेसला विसरता येणार नाही.” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले, “काँग्रेस-मुक्त भारत असू शकत नाही. देशाला पुढे न्यायचे असेल तर काँग्रेसला विसरता येणार नाही. देशाच्या प्रगतीसाठी काँग्रेसला सोबत घेणे आवश्यक आहे. पक्षाच्या मूल्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. धोरणांमध्ये मतभेद असू शकतात आणि माझ्यातही आहेत, पण त्यांनी देशासाठी दिलेले योगदान आपण विसरू शकत नाही, असे पवार म्हणाले. तसेच “जे सत्तेत आहेत ते काँग्रेसबद्दल द्वेष पसरवत आहेत. अशी टीकाही यावेळी शरद पवार यांनी केली. काँग्रेस आणि पुण्याचे घट्ट नाते असल्याचे त्यांनी म्हंटले.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील तसेच इतर स्थानिक राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित होते.