शबनम न्युज | मुंबई
“लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प आहे,” अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर केली आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा पाचवा अर्थसंकल्प २०२३ सादर करण्यात आला. यांनतर विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला चुनावी जुमला असल्याचे सांगत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
ते म्हणाले, “देशातील मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी वरकरणी प्राप्तीकराची सूट मर्यादा वाढविण्याचा दिखावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मध्यमवर्गीयांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कोणतीही ठोस तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘वेलफेअर स्टेट’ची संकल्पना मोडीत काढणारा हा अर्थसंकल्प आहे,” अशी टीका अजित पवार यांनी केली.सन २०१८ ते २०२२ या काळात देशाचा ‘जीडीपी’ वाढीचा दर सरासरी अवघा तीन टक्के असताना हा देशाचा अमृत काळ कसा होऊ शकतो, असा सवाल उपस्थित करत, देशाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कररुपाने सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पातून फारसे काही आलेले दिसत नाही, महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा ‘चुनावी जुमला’ असणारा हा अर्थसंकल्प असल्याचा आरोपही त्यांनी केला.