शबनम न्युज | मुंबई
“खारघरमधील घटनेवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. ज्या लोकांनी साधूंच्या हत्येनंतर छाती पिटली, ते लोक आज खारघरमधील ५० जणांच्या मृत्यूनंतर गप्प बसले आहेत. हे फडणवीसांचं ढोंग आहे,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यावर केली आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात खारघर येथे उष्मघाताने श्रीसदस्यांचे निधन झाले. त्यांनतर अनेक स्तरातून शोक व्यक्त केले जात आहे तसेच राज्यात या घटनेवरून राज्य सरकारवर टीकाही केली जात आहे. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या घटनेवर कोणतेही भाष्य केले नाही. याच कारणावरून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला तर बूच लागलं आहे. पालघरमध्ये जमावाने तीन साधूंची हत्या केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष डहाणूमध्ये ठाण मांडून बसले होते. पण ज्या ५० श्रीसेवकांचा मृत्यू झाला, त्यांच्यासाठी फडणवीसांच्या डोळ्यात साधी सहानुभूतीही दिसत नाही. ज्या लोकांनी साधूंच्या हत्येनंतर छाती पिटली, ते लोक आज खारघरमधील ५० जणांच्या मृत्यूनंतर गप्प बसले आहेत. हे फडणवीसांचं ढोंग आहे,” अशी टीका राऊतांनी केली.
तसेच राष्ट्रवादीत जे काही सुरु आहे, त्यावर मी बोलू इच्छित नाही. त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. पण महाविकास आघाडीवर मी बोलतच राहणार आहे. राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, हे सत्य आहे. सत्य मी बोलणारच आहे. तसेच भाजप दबावतंत्र वापरून फोडाफोडीचं राजकरण करत आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.