शबनम न्युज | यवतमाळ
गरीब, कामगार, मध्यमवर्गीय जनता सकाळीच कामाला निघून जातात. त्यामुळे अशा लोकांना आरोग्य सेवेसाठी खाजगी दवाखान्यावर अवलंबुन रहावे लागते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशाच नागरिकांसाठी दुपारी २ ते रात्री १० या वेळेत सुरु राहाणार असून कामगार, मजूर अशांसाठी हा दवाखाना अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे काल कामगार दिनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन भोसा येथे करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री श्री. राठोड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड, उपवनसंरक्षक श्री धनंजय , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर डी राठोड उपस्थित होते.
मुंबईत मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. त्यांची कामावर जाण्याची वेळ सकाळची असल्यामुळे या लोकांना आरोग्य सेवेसाठी खाजगी दवाखान्यावर अवलंबून राहावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन मुंबईत आपला दवाखान्याचा प्रयोग करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवले. त्याचवेळी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात आपला दवाखाना सुरू करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यानंतर आज आपला दवाखाना जिल्ह्यात सुरू झालेला आहे. आज त्याचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद झाल्याचे संजय राठोड यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण ३७ दवाखाने उघडणार असून पैकी बारा आज सुरू झालेत. आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना चांगली सेवा सुविधा आणि औषधे मिळणार आहेत मुख्यमंत्र्यांची ही संकल्पना आरोग्य विभागाने प्रत्यक्षात पुढे न्यावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, गरीब लोकांना साध्या बाह्य रुग्ण सेवेसाठी खाजगी दवाखान्यात जावे लागते. तिथे तज्ञ डॉक्टरांची व्यवस्था नसते तरीही त्याचा आर्थिक भार शहरी भागातील गरीब लोकांना बसतो. आपला दावाखान्याच्या माध्यमातून ही व्यवस्था आता बदलता येईल. लोकवस्ती जास्त असणाऱ्या ठिकाणीच आपला दवाखाना सुरू होणार आहे. त्यामुळे गरीब लोकांचा दवाखाना आणि प्राथमिक आरोग्यासाठी होणारा खर्च आपल्याला आपल्या उत्तम आणि चांगले सेवेच्या माध्यमातून टाळता येईल. आपली सेवा चांगली राहील याचा आपण कसोशीने प्रयत्न करूया असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.