शबनम न्युज | मुंबई
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा या मोठ्या दिमाखात पार पडत असतानाच आता पुढील वज्रमूठ सभा या तूर्तास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा छत्रपती संभाजीनगर तसेच नागपूर व मुंबईत पार पडली. मात्र, यापुढील सभा तूर्तास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. नुकतेच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. तर आता महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा तूर्तास रद्द झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा पावसाळा असल्याने तूर्तास रद्द करण्यात आल्या असून, पुढे ढकलण्यात आले असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधील तसेच शिवसेनेमधील नेते या वज्रमूठ सभा रद्द झाल्याच्या वेगवेगळ्या प्रकारे कारणे देत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा छत्रपती संभाजी नगर येथे झाली त्यानंतर भाजपच्या बालेकिल्ला असणाऱ्या नागपूर मध्ये दुसरी सभा पार पडली. तर १ मे महाराष्ट्र दिन या दिवशी मुंबईमध्ये सभा पार पडली. यानंतर पुढील टप्प्यात कोल्हापूर, नाशिक व पुणे या राज्यातील प्रमुख शहरात सभा नियोजित होत्या. मात्र, या सभा आता रद्द करण्यात आले आहेत, तिसऱ्या टप्प्यात अमरावती, सोलापूर, जळगाव या ठिकाणी सभा होणार होत्या.