शबनम न्युज | मुंबई
माध्यम क्रांतीच्या आजच्या युगात पारंपरिक माध्यमांपेक्षा प्रभावी मत परिवर्तक, व्हिडीओ ब्लॉगर्स व खासगी चॅनेल्सद्वारे निर्मित बातम्या व विश्लेषण पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अपप्रचारांचा योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमांतून मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. या दृष्टीने माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
विश्व संवाद केंद्र, मुंबईच्या वतीने देण्यात येणारे 22 वे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ राज्यपाल बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 3) राजभवन येथे समारंभपूर्वक देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व समाजमाध्यम क्षेत्रातील 10 पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आपण 1978 मध्ये नगरसेवक झालो. तिथपासून आजपर्यंतच्या काळात माध्यम क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. पूर्वी चहासोबत वृत्तपत्र वाचल्याशिवाय लोकांची दिवसाची सुरुवात होत नसे. आजच्या युगात देखील मुद्रित माध्यमांचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे, त्यामुळे मुद्रित माध्यमे संपणार नाहीत, असे सांगताना वृत्तपत्रे समकालीन घटनांचे अभिलेख असतात व पुढे त्याचेच रूपांतर इतिहासात होते, असे राज्यपालांनी सांगितले.