विशेष लेख –
लेखिका | गजाला सय्यद
"आठवण'... म्हणजे काय तर प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टी मागील काही विचार, घडलेली घटना, एखादा प्रसंग, आवडीनिवडीची गोष्ट, जीवनात घडणारी कोणतीही घटना. ती मग दुःखद असो किंवा सुखद. प्रेम, चांगली किंवा वाईट परिस्थिती, बालपण, मित्र-मैत्रिणी, आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-बहीण, प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको यांच्या सोबतच्या घटना. असो.. त्या सर्व गोष्टी ज्या आपल्या मनात राहणे, म्हणजे त्याबद्दल आठवणी राहणे. आठवण ही प्रत्येक घटनेची राहत नाही, मात्र एखादी विशेष गोष्ट आपल्या मनात कायमचे घर करून राहते ना, तेव्हा ती आठवण बनते आणि आठवणींना कधीही अंत नसतो. मी नेहमी विचार करते, जेव्हा मी एखादी गोष्ट विसरायचा प्रयत्न करते, तेव्हा त्या गोष्टीवर मी जास्त विचार करते आणि एखादी गोष्ट कितीही आठविण्याचा प्रयत्न केला तर ती सहजपणे आठवत नाही. म्हणजे आठवणी कशा असतात ना सोबत असली तरीही त्रास, नसली तरीही त्रास. म्हणून आठवणी या अशाच असतात, ज्यांना अंत नसतोच. काही लोक आठवणी मागे सोडण्याचा देखील प्रयत्न करतात मात्र, त्या सुटत नाहीत कारण ही मनातली गोष्ट आहे जी मनात रुजू झालेली असते, आपण किती देखील प्रयत्न केला तरीही आठवणींचा अंत आपण करू शकत नाही. जीवनात, मनात कोठे ना कोठे या आठवणी छोटशा असल्या तरी घर करून राहतात.
मला जे हवं होत ते मला मिळाले नाही, म्हणून ते स्वतः लिहण्याचे धाडस करतेय. आता असे काय हवे होत मला? हा विचार येत असेल पण… जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करून ती घेतो आणि त्यामध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही तर कसे वाटते, हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच! अर्थात एक उदाहरण, जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्याला चांगली व्हावी अशी वाटते, मात्र प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होईल असे नसतेच. तसेच काही झाले माझ्या सोबत. लेखक, पत्रकार, भालचंद्र मगदूम यांची “आठवणींना अंत नाही’, हे पुस्तक माझ्या एका मित्राकडून मी घेतले. मला पुस्तकात लेख किंवा गोष्टी असेल तर आणि त्याहून जास्त कविता आवडतात. आणि त्या काही वेगळ्या विषयावर असतील तर छानच मग तर. पुस्तक घेण्याअगोदर हे बघितले नाही कि यामध्ये सर्व कविता आहेत. “आठवणाना अंत नाही’ हा विषय आहे तर काही तरी वेगळंच, काही नवीन वाचायला मिळणार, हा विचार करून पुस्तक हातात घेतले. मात्र पुस्तक उघडताच कळले या मध्ये फक्त आणि फक्त कविताच आहे. तरी पूर्ण पुस्तक वाचले. पण जे हवे होत ते तर मिळाले नाही. म्हणून ते स्वतः लिहण्याचा हा माझा प्रयत्न.
जेव्हा एखाद्या गोष्टीची आठवण मनात राहते तर ती हरवत नाही. जेव्हा मी ही पुस्तक हातात घेतले तेव्हा मनात आलेली भावना….नक्कीच या मध्ये भालचंद्र मगदूम यांनी त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींबद्दल लिहले असेल किंवा “आठवण’ याबद्दल तरीही काही नवीन वाचायला मिळेल, ही उत्सुकता होती. मात्र ही फार सुंदर आठणींच्या कवितांनी भरलेले असे पुस्तक आहे. मला जे हवं होत ते मिळालं नव्हतं पण यामधील कविता खूपच सुंदर अशा होत्या. भालचंद्र मगदूम हे आज आपल्या सोबत नाहीत. मात्र त्यांनी लिहलेले हे पुस्तक नेहमीच त्यांची आठवण देत राहील.
काही गोष्टी आपल्या आयुष्यातून लांब जाऊनही त्या लांब नसतात. त्या आपल्या आठवणीत असतात, एखादी व्यक्ती, भावना, घटना, गोष्टी या स्वरूपात त्या आपल्या कायम सोबत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यातील ही गोष्ट आहे. जी काही न काही, जी कोणत्याही प्रकारची असो एक आठवण असते आणि ती सुटत नसते. काहींना आठवणी फार प्रिय असतात. तर काहींना त्या नकोशा असतात. कारण काही आठवणी या त्रास दायक असतात तर काही आनंददायी. माझ्याही आयुष्यात अनेक घटना घडल्या, अनेक प्रसंग पाहायला मिळाले, अनेक व्यक्ती आले अन गेलेही. पण आठवणीत तीच गोष्ट राहिली जी मनात रुजू झाली. म्हणजे ती एका व्यक्तीची आठवण, त्यांची आठवण ज्यांची कोणतीही गोष्ट न विसरता येणारी आहे माझ्यासाठी, त्यांच्या सोबतीचे ते क्षण कधीही विसरता येणार नाहीत अशी व्यक्ती म्हणजे “माझी आजी’. आजीला आम्ही “दादीअम्मी’ असे म्हणायचो. कारण त्याही आमच्या आईच होत्या. आता त्या या जगात नाहीत, मात्र त्यांच्या आठवणी कायम माझ्या सोबत आहेत. मी आयुष्यात नेहमी कोठेही असेल तरीही मला त्यांची गरज आजही भासते. कारण माझी आजी माझ्या फार जवळ होती. ती सर्वकाही होती माझ्यासाठी. आता आठवणींचा विषय आणि माझी आठवण कशी लांब राहणार तर सुरुवात आता माझ्या आठवणी पासून….
जन्म झाला तेव्हा पासून आई सोबत आजीनेही आमचा सांभाळ केला. लहानपणी आई कडे जेवढे राहिलो नसेल तेवढे आम्ही आजीकडे राहिलो. आजी ही आजीच असते. खूप प्रेमळ, जीव लावणारी माझी आजी कधीही त्यांची आठवण माझ्याहून लांब गेली नाही. आजी नेहमी सकाळी लवकर उठून आम्हाला शाळेसाठी तयार करायची. शाळेतून परत आले की जेवण तयार असायचे. तस तर मला सकाळी उठायचा एवढा कंटाळा यायचा की बस्स… पण शाळेला सुट्टी लागली की, मी आजी सोबत सकाळी लवकर उठायचे, तेव्हा आजी मला नेहमी म्हणत, “अरे इतने जल्दी उठ गयी, सो जा अभी’, पण मी आजीकडे झोपले की त्यांच्या उठण्याच्या स्पर्शाने मीही त्यांच्या सोबत जागी व्हायचे आणि नंतर झोपच लागयाची नाही. आजीने खरच खूप सांभाळ केला आमचा. मला आजही आठवतंय आजी ना मला नेहमी म्हणायची “गजाला देख तुझे सबकुछ आना चाहिए्। आगे तक पढ़ना हे कुछ बनना हे।’ आणि मला अभ्यासातही आवड होतीच. आजीचे ते बोलणे आजही आठवते, मी खूप लहान होते तेव्हा आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मी लहानपणीच्या सर्व काही गोष्ट विसरले, हो मात्र आजीची प्रत्येक गोष्ट कायम स्वरूपी मनात राहिली. तिचे बोलणं, तिचे प्रेम करणं, हा काही वेळा धिंगाणा केला तर ओरडा देखील खालेल्ला मी. पण लहान पणापासून आजी, आई- बाबांनी लाडावून ठेवलंय मला ते आजतागायत. आजी गेली पण त्यांचं प्रेम आजही आहे सोबत… मला आठवतंय आजी म्हटली होती, “मुझे आप सबका निकाह देखना है.” आमचं म्हणजे मी, माझा मोठा दादा आणि लहान बहीण आमचे सर्वांचे लग्न त्यांना बघायचे होते. पण काळाचा घात झाला आणि ती सोडून गेली. आता दादाचे लग्न झाले, त्याचे लग्न होत होते आणि मला माझ्या आजीच्या आठवणीने आळा घातला होता. अक्षरशः एका खोलीत मी रडत बसलेले. मला तेव्हा आजीची ती गोष्ट आठवलेली. खरं तर आजी सोडून जाण्याचं दुःख आजही तेवढंच आहे. आता तर वाटते स्वतः च्या लग्नच्या दिवशी देखील मला आजीची आठवण येईलच. आजी हवीशी वाटेत मला आजही. त्यांच्या आठवणी माझ्यासाठी आनंददायी आठवणी आहेत. कधीही न संपणाऱ्या, कधीही न विसरता येणाऱ्या….. या सर्व माझ्या आयुष्यातील सुखातला आठवणी बनल्या ज्या आठवणींना कधीही अंत नाहीये..!!
माझा हा लेखन प्रपंच खरे तर आठवणींवर लिहायला घेतला होता अन खरंच माझी प्रेमळ एकच आठवण, ज्यांच्या बद्दल आज मी लिहिले. आठवणींना खरं तर कधीच अंत नसतोच. जीवनात व्यक्ती येत असतात, जात असतात, मात्र त्यांच्या गोष्टी कायम स्वरूपी आपल्या मनात राहिल्या कि त्या आठवणी बनतात….आणि आठवणींना कधीही अंत नसतोच..!!