शबनम न्युज | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी कडून नोटीस पाठवण्यात आली आहे. सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटीशीतून देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आता ईडीचे नोटिशीनंतर जयंत पाटील यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “काल माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याच्यात ईडीने मला नोटीस पाठवली, सहाला ती माझ्या घरी आली. नोटीसमध्ये काही कारण सांगितलेलं नाही. फाईल काढून पाहिल्या तर असं दिसतंय आयएसएफएल नावाची कुठलीतरी संस्था आहे आणि त्यासंबंधीत काही केस आहेत. त्याच्याशी माझा कधी आयुष्यात संबंध आला नाही. कधी त्यांच्या दारात गेलो नाही, कधी लोन घेतलं नाही. त्यामुळे माझा काही संबंध नाही. पण आता बोलावलंय तर चौकशीला सामोरी जाऊ.”
तसेच “दोन तीन दिवस जरा लग्नसराई आहे, घरातली जवळची लग्न आहेत. त्यामुळे ईडीकडे ही लग्न झाल्यानंतरची वेळ मागवणारं पत्र मी आज पाठवून देईन. ईडीची नोटीस कशाला येते हे भारतात सर्वांना माहितीय. त्यामुळे नोटीस येणं, त्याला उत्तर देणं हे सर्व करू. माझं राजकीय आयुष्य हे उघडी किताब आहे. माझा काही प्रॉब्लेम नाही. घोटाळे करण्याचा कार्यक्रम मी कधी केलेला नाही. आवश्यक असलेली माहिती मी देईन. मनीलॉड्रींगटाईप काम कधीच केलेलं नाही. त्यामुळे काही अडचण वाटत नाही” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.