शबनम न्युज | मुंबई
“आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल गेल्या काही दिवसांत दुसऱ्यांदा मातोश्रीवर आलेत. नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. काही लोक फक्त राजकारण करतात. आम्ही मात्र राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं जपत असतो. राजकारण आपल्या जागी असतं. येणारं वर्ष निवडणुकीचं आहे. यावेळी जर ट्रेन सुटली, तर आपल्या देशातून लोकशाही गायब होईल. लोकशाहीला वाचवण्यासाठी देशातून जे लोकशाही हटवू इच्छितात, त्यांनाच मी विरोधी पक्ष म्हणेन”, असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी सर्व प्रमुख नेत्यांमध्ये विरोधी पक्षांच्या आघाडीवर सविस्तर चर्चा झाली. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान शरद पवारांचीही भेट घेण्यासाठी जाणार आहेत. या भेटीनंतर तिन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी बोलताना एक गंभीर शक्यता वर्तवताना भीती व्यक्त केली आहे.