शबनम न्युज | पिंपरी
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी या सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, प्रबोधन, महिला सबलीकरण, एनडीए प्रशिक्षण, धार्मिक संवर्धन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत गेली ३९ वर्षे कार्यरत असलेल्या संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२३ आणि मंडळाचा ४०वा वर्धापनदिन रविवार, दिनांक २८ मे २०२३ रोजी सायंकाळी ठीक ६:३० वाजता ग.दि.माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी प्राधिकरण येथे आयोजित केला आहे.
गेली सलग १४ वर्षे सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्टसेवा या विचारांना अनुसरून उत्तम काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार रुपये १०००००/- (रुपये एक लक्ष फक्त) आणि स्मृतिचिन्ह; तसेच राज्यस्तरीय पुरस्कार रुपये ५१०००/- (रुपये एकावन्न हजार फक्त) आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात येते. या वर्षीचे पुरस्कार सामाजिक समरसता, पर्यावरण या क्षेत्रांत देशपातळीवर प्रत्यक्ष काम करणारे, साहित्यिक, वक्ते आणि व्यासंगी अभ्यासक डॉ. रमेश पांडव सदस्य, अखिल भारतीय समरसता गतिविधी मंडळ (रा.स्व.संघ) यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्यावतीने देण्यात येणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार’ फुटीरतावाद आणि धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलेल्या मणिपूर राज्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेची बीजे पेरून या भागाची उर्वरित भारताशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्यासाठी गेली ३७ वर्षे अविरत कार्य करीत असलेल्या ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान, मणिपूर’ या संस्थेला; तर ‘राज्यस्तरीय पुरस्कार’ १९९७ पासून छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असलेल्या, पूर्वांचलातील मुले व मुलींच्या शिक्षणासाठी व त्यांची नाळ देशातील इतर भागांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या, त्यासाठी शिक्षण व निवासव्यवस्था करणाऱ्या ‘पूर्वांचल विकास प्रकल्प छात्रवास, छत्रपती संभाजीनगर’ यांना प्रदान करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार सोहळा प्रमुख प्रदीप पाटील यांनी ही माहिती देऊन सर्व नागरिकांनी आवर्जून या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.