शबनम न्यूज , प्रतिनिधी :
अल्कोहोल विरहित आयुर्वेदिक लिकर तसेच दुधात न फाटणारा गुळाचा चहा या विषयी संशोधन केल्याबद्दल पिंपरीतील डॉ. श्रीधर आरबुने पाटील यांना ‘भारत गौरव रत्न श्री सन्मान पुरस्कार’ देऊन नुकतेच दिल्लीत गौरविण्यात आले.
शोध प्रकल्प, चिकित्सा,निर्मिती आणि सादरीकरण आदी विषयांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण संशोधन कामगिरी केलेल्या देशातील अठरा जणांना हा पुरस्कार देण्यात आला असून डॉ. आरबुने पाटील हे शहरातील व राज्यातील पहिले या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
भारत सरकारच्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या मान्यतेने या पुरस्कारांचे वितरण केले जाते.
दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री व दिल्ली जल बोर्डाचे अध्यक्ष सौरभ भारद्वाज, माजी क्रिकेट कप्तान मदनलाल शर्मा, आणि राष्ट्रीय कुस्तीपटू नरसिंग यादव यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन डॉ आरबुने पाटील यांना गौरविण्यात आले. अमृततुल्य चहाची दुकाने या लोकप्रिय प्रकारानंतर खास गुळाचा चहा हा व्यावसायिक प्रयोग राज्यात यशस्वी करण्यामध्ये व लोकप्रिय करण्यामध्ये डॉ आरबुने पाटील यांचे महत्त्वपुर्ण योगदान आहे.