शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव आळंदी या ठिकाणी शारीरिक शिक्षण विभागाअंतर्गत वार्षिक क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व वैष्णवी पांचाळ, काजल पवार आणि विशाखा म्हसतकर यांच्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. संजीव कांबळे, परीक्षा विभाग प्रमुख यांनी महाविद्यालयात दि.०९/०५ /२०२२ ते १२ /०५ /२०२२ या काळात महाविद्यालयाअंतर्गत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असे सांगून या क्रीडा स्पर्धेत महाविद्यालयातील कला, वाणिज्य व बी.बी.ए ( सी.ए) या शाखेतील ३०० विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता तसेच नवीन खेळाडूंचे कौतुक व खेळाचा दर्जा वाढविणे हा कार्यक्रमाचा मूळ उद्देश महाविद्यालयाअंतर्गत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे म्हणजेच ऑलम्पिक स्पर्धेची पूर्वतयारी होय असे मत व्यक्त केले. यावेळी कबड्डी, खो-खो, चेस, गोळा फेक, रस्सीखेच, हॉलीबॉल व कॅरम या क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. रणजित कदम यांनी करून दिला.या प्रसंगी मा.श्री. रवींद्र पन्हाळे पोलीस उपनिरीक्षक रावेत, पुणे. यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तरुणाई व गुन्हेगारी याबद्दल मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी कोणत्याही धार्मिक व जातीय दंगलीत सहभागी न होता आपल्या कर्तृत्वाला महत्व दिले पाहिजे असे मत मांडून सोशल मीडियाचा वापर कसा करावा याबाबत विविध उदाहरणासह मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते पाटील सचिव – हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळ राजगुरुनगर,पुणे. यांनी महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा म्हणजे तरुणाईला जिवंत ठेवण्याचा कार्यक्रम असून स्वतःमध्ये बदल घडविण्याची सुवर्णसंधी आहे. असे मत व्यक्त करीत विद्यार्थी जीवनात स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मिळणे म्हणजे भावी आयुष्यासाठी प्रेरणा असून प्रत्येकाने स्वतःमधला मी शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तसेच शिक्षण घेत असताना आपल्याकडे कौशल्यावर आधारित शिक्षण असणे सुद्धा काळाची गरज असून जीवनात यशस्वी होण्यासाठी कला,साहित्य,क्रीडा, पत्रकारिता असे विविध क्षेत्र असून आपल्या आवडीनुसार प्रत्येकाने क्षेत्र निवडले पाहिजे. विद्यार्थीदशेत स्टेज,ग्राउंड व भाषा इत्यादींचे शिक्षण सुद्धा असणे आधुनिक काळात किती महत्त्वाचे आहे यावर भाष्य करीत कुटुंब व महाविद्यालय हे संस्कार देणारे घटक असून आयुष्यात आपल्या आत दडलेला उत्तम माणूस जन्माला आला पाहिजे असे मत व्यक्त करीत चांगला माणूस म्हणून आपल्याकडे चांगली दृष्टी हवी चांगली दृष्टी असेल तरच आपल्याला पूर्ण जग सुंदर दिसेल यासंदर्भात विविध उदाहरणासह विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केवळ यशस्वी होण्यापेक्षा यशस्वी माणूस होणे किती महत्त्वाचे आहे असे मत मांडून समाजात अनेक व्यक्ती धर्म,जात यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात या वादात विद्यार्थ्यांनी न अडकता आपल्या उज्वल भविष्याकडे मार्गक्रमण करण्याची गरज असून विद्यार्थ्यांचे खरे भविष्य त्यांच्या हातात असते हे विविध उदाहरणासह स्पष्ट केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विकास दिघे,शारीरिक शिक्षण संचालक यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला प्रा. माणिक कसाब, प्रा.शाहूराज येवते, प्रा.शैला वाळुंज, प्रा. डॉ. छाया जोशी,प्रा.यशोदा खुळखुळे, प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. सोनाली अभंग, प्रा. दिपाली सोनवणे,प्रा.विश्वनाथ व्यवहारे, प्रा. डॉ. राजू शिरसकर प्रा. प्रविण डोळस इत्यादी विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप बारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. कैलास अस्तरकर यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.