शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील पायाभूत सुधारणा आणि मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी मुहुर्तमेढ रोवणा-या दिवंगत खासदार अण्णासाहेब मगर यांनी पिंपरी चिंचवड नगरीच्या जडणघडणीची पायाभरणी केली. औद्योगिकरणाला चालना देऊन महानगरपालिकेला आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन दिले. त्यांच्या दूरदृष्टीकोनामुळेच आज पिंपरी चिंचवड शहर देशात नावारुपाला आले असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांच्या प्रतिमेस तसेच प्रांगणातील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण केला त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, नगरसदस्य केशव घोळवे, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, पदाधिकारी सुरेश गारगोटे, सामाजिक कार्यकर्त्या सीमा काळभोर उपस्थित होत्या.
महापौर ढोरे म्हणाल्या सहकार क्षेत्रासह शेतकरी, कामगार आणि समाजातील सर्व घटकांसाठी अण्णासाहेब मगर यांनी भरीव कार्य केले. पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणा-या अण्णासाहेब मगर यांनी शहरातील नागरिकांसाठी शाळा, रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक दवाखाने, उद्याने इत्यादी नागरी सुविधा उपलब्ध करुन दिल्या. त्यांच्या उत्तुंग कार्याप्रती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अण्णासाहेब मगर यांनी शहरविकासाची दाखविलेली दिशा पिंपरी चिंचवडसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.