पिंपरी । प्रतिनिधी
तुळशीच्या रोपाला भारतीय संस्कृतीत पूजनीय स्थान आहे. त्याचप्रमाणे तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असून सकारात्मक ऊर्जा असते. कोरोनानंतर समाजामध्ये एका प्रकारची मरगळ आल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अमर मित्र मंडळ आणि भाजपाचे युवा कार्यकर्ते उदय गायकवाड युवा मंचच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त दिघी परिसरात तब्बल १५ हजार तुळशीच्या रोपांचे वाटप सुरू करण्यात आले. शिक्षक दिनापासून (दि.५) या उपक्रमाची सुरवात करण्यात आली.
यावेळी मेजर अशोक काशिद, आमसिद्ध भिसे, प्रल्हाद जगताप, पंडित शिंदे, नवजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायक वाळके, शिवाई नागरी पतसंस्थेचे चेअरमन संजय गायकवाड, बाळासाहेब तारडे, नारायण गोडसे आदी उपस्थित होते.
यावेळी दिघी परिसरातील सर्व शिक्षक, महिला शिक्षक यांच्याहस्ते तुळशी पुजन करुन कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. तसेच, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानही करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत नगरसेविका निर्मला मनोज गायकवाड यांनी केले. माजी नगरसेवक ह.भ.प. दत्तात्रय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. भाजपा युवा मोर्चाचे दिघी-चऱ्होली मंडलाध्यक्ष उदय गायकवाड यांनी आभार मानले.
उदय गायकवाड म्हणाले की, दिघीतील अमर मित्र मंडळाच्या माध्यमातून नेहमीच लोकाभिमुख आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेगळा आणि सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली. दुसरीकडे कोरोना काळ हा सर्वांसाठीच कठीण होता. दरम्यान कोरोनातून सावरत असताना समाजात नकारात्मकता वाढत असल्याचे चित्र आहे. तर अनेकांची मानसिकता खालावली आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने त्याचा समतोल साधनेही तितकेच महत्वाचे आहे. तुळशीच्या रोपाला धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्व आहे. तुळस घराघरात पुजली जाते तसेच या रोपामध्ये नवचैतन्य आणि सकारात्मकता निर्माण करण्याची शक्ती आहे. यामुळे गणेशोत्सवाचे औचित्य साधून तुळस वाटपाद्वारे बाप्पाला अभिवादन करण्याचा निर्णय आम्ही घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा दिघी-बोपखेल प्रभागाचे अध्यक्ष अमित महाडिक यांनी केले.
*
…असे आहे उपक्रमाचे स्वरूप
या उपक्रमांतर्गत १५ हजार रोपे घरोघरी वाटण्यात येणार आहे. यामुळे शिक्षकदिन म्हणजेच ५ सप्टेंबरपासूनच या उपक्रमाची सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे, रोपांसोबतच आरती संग्रह घरोघरी पोहचविण्यात येत आहे. संपूर्ण गणेशोत्सव काळात उपक्रम सुरु राहणार आहे. तसेच सर्व रोगराई नष्ट होऊन पुढील वर्षी बाप्पाचे वाजत-गाजत मिरवणुकीद्वारे स्वागत करता येईल अशी प्रार्थना असल्याचा भावना उदय गायकवाड यांनी व्यक्त केल्या आहेत.