राष्ट्रवादीचे रविकांत वरपे यांच्यावर सडकून टिका
बाहेरच्यांनी शहरात येऊन उपदेशाचे डोस पाजण्याची गरज नाही
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.१० डिसेंबर) :- तब्बल पंधरा वर्षे पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता भोगून राष्ट्रवादीने नागरिकांच्या पैशांचा मलिदा लाटला. प्रत्येक निविदेत आपल्याच बगलबच्च्यांना कामाला लावून अक्षरषः पालिका लुटून खाल्ली आहे. राष्ट्रवादीच्या मोठमोठ्या स्थानिक पदाधिका-यांनी महापालिकेला अक्षऱषः कंगाल केले होते. एवढे करूनही ‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हजको’ याप्रमाणे राष्ट्रवादी आव आणित आहे. त्यामुळे बाहेरच्यांनी शहरात येऊन उपदेशाचे डोस पाजण्याची गरज नाही, अशा शब्दांत भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांनी युवक राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांचा समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खराळवाडी पिंपरी येथील कार्यालयात बुधवारी (दि. ८) युवक आघाडीची आढावा बैठक झाली. या बैठकीत वरपे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर ‘मनपाचे टेंडर आणि भाजपा पदाधिकारी वेंडर’ अशी टिका केली. त्याची मोरे यांनी चांगलीच दखल घेतली असून वरपे यांचा शेलक्या भाषेत समाचार घेतला. सलग पंधरा वर्षे राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता भोगली. सत्तेचा गैरवापर करून आपल्याच बगलबच्च्यांना पोसण्याचा उद्योग केला. ‘सत्ता सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ असा राष्ट्रवादीचा जुलमी कारभार नागरिकांनी पंधरा वर्षे सहन केला. ‘आति तिथे माती’ अशातला प्रकार होऊन पालिकेतील भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ता 2017 ला नागरिकांनी अक्षरषः उधळून लावली. मतदारांनी बहुमताने भाजपाला निवडून दिले. भाजपाने शहरात विकासकामे करून नागरिकांचा विश्वास जपला. भाजपाने केलेली विकासकामे पिंपरी-चिंचवडकरांना महिती आहेत. त्यामुळे बाहेरच्या कोण्या व्यक्तीने शहरात येऊन फुकटची डरपोक्ती करण्याची गरज नाही, असा इशारा मोरे यांनी दिला.
पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव याठिकाणी स्मार्ट सिटीची कामे वेगाने सुरू आहेत. हे नागरिकांना येताजाता दिसत आहे. पुणे महामेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. आवास योजनेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना हक्काची घरे मिळणार आहेत. 7 आणि 9 मीटर लांबीच्या ई-बसेस पीएमपीएमएलच्या ताफ्यात देण्यात आल्या. कोट्यवधी रुपये खर्चून शहराची ड्रेनेज आणि पाणी पुरवठा लाईन नव्याने भूमिगत करण्यात आली. समाविष्ठ गावात 420 कोटींचे रस्ते करण्यात येत आहेत. 100 कोटी रुपये खर्चून निगडी भक्ती-शक्ती येथे वर्तुळाकार उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर बनविण्यात आला. स्मार्ट सिटीकडून स्मार्ट शाळा तयार करण्यात येत आहेत. नवीन पीढी घडवण्यासाठी भाजपाने शिक्षणाला महत्व दिले आहे.
राष्ट्रवादीच्या पापिष्ट कारभारामुळे नागरिकांना दिवसाआड पाणी
शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी आंद्र, भामा आसखेड धरणातून पाणी आणले जाणार आहे. या दोन्ही प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. आंद्र धरणातून शंभर एमएलडी पाणी शहरात आणण्यासाठी आवघा महिनाभराचा वेळ लागणार आहे. परंतु, राज्यातील बिघाडी सरकारच्या हुकूमशाहीमुळे या प्रकल्पाला विलंब होत आहे. राष्ट्रवादीच्या एकहूकुमी काराभामुळे मावळातील पवना जलवाहिनी प्रकल्प गुंडाळण्यात आला. या पापीष्ट कर्मामुळे शहरातील नागरिकांना आज दिवसाआड पाणी मिळत आहे. आता भाजपा सत्तेतून कदापी हटणार नाही हे राष्ट्रवादीला कळून चुकले आहे. त्यामुळे भाजपावर बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे.