शबनम न्युज | पुणे
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘पत्ररूप भावार्थ गीत रामायण’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सुखदु:खाच्या प्रसंगात ग्रंथातील विचारांचा निश्चितपणे फायदा होईल असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सर परशुराम महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन कळमळकर, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके, हेमंत वाळुंजकर, लेखक धनंजय कुलकर्णी, आनंद माडगुळकर आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, श्रीरामाच्या जीवनातील आदर्श देशासमोर आहे. अनेक वर्षापासून गीत रामायणाचे शब्द घराघरात पोहोचले आहेत. या गीतातील भावार्थ टीपणारा हा गद्य स्वरुपातील ग्रंथ लेखक धनंजय कुलकर्णी यांच्या माध्यमातून आपल्यासमोर आला आहे. हे एक प्रकारचे असाधारण काम असून या पुस्तकापासून इतरांना प्रेरणा मिळेल. या ग्रंथाच्या प्रती घरोघरी पोहचवाव्यात अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी कुलगुरु डॉ. करमळकर, श्री. मोरे, श्री. कुलकर्णी व श्री. माडगुळकर यांनीही यावेळी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सांगता हेमंत वारुंजकर यांच्या गीत रामायणातील गीत सादरीकरणाने झाली.