शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
सुशिक्षित बेरोजगारांच्या रिकाम्या हाताला काम मिळाल्यास त्यांच्यामधील नैराश्य नष्ट होण्यास मदत होते. तसेच त्यांच्या जीवनाला सकारात्मक दिशा मिळते. गुन्हेगारी क्षेत्राकडे अनावधानाने ओढल्या जाणा-या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्यास वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे सहज शक्य होईल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी केले.
शहरातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये (आयटीआय) भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य शशिकांत पाटील,सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संदिपान झोंबाडे, भाऊसाहेब आडागळे, सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी रासकर, रयत विद्यार्थी मंचाचे पदाधिकारी धम्मराज साळवे, संतोष शिंदे, मयूर जगताप, प्रमोद लोंढे, भाग्यश्री आखाडे, प्रगती कोपरे, माधवी खरात, अविनाश इनकर, अक्षय गायकवाड, मोरवाडी आयटीआयचे गटनिदेशक विजय आगम, प्रकाश घोडके, ज्योत सोनवणे, निदेशक मंगेश कत्तपुरे, निलेश लांडगे, शिवदास वाघमारे, तानाजी कोडगे, गणेश सुर्वे, किसन खरात, सचिन तापकीर, अरुण बांबळे, मनोज ढेरंगे, जीवन ढेकळे, संजीव अभ्यंकर, जितेंद्र कारवटे, भानुदास दुधाळ यांच्यासह महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच रोजगार मेळाव्यासाठी आलेले विद्यार्थी उपस्थित होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक आवताडे म्हणाले, सध्या गुन्हेगारीकडे वळलेले तरुण बेरोजगार असून त्यांना समुपदेशन करून योग्य मार्गाकडे घेऊन जाण्याची सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. अशा पद्धतीने कार्यक्रम राबवून व्यवसाय तसेच रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्यास समाजात सकारात्मक बदल घडेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सामाजिक कार्यकर्ते संदिपान झोंबाडे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जागतिक दर्जाचे होते. त्यांनी कामगारांच्या रोजगारासाठी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे. महापुरुषांच्या लिखाण, कार्य आणि विचारांतून प्रेरणा घेऊन स्वतःमधील क्षमता आणि कौश्यल्य ओळखून व्यवसायभिमुख शिक्षण घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रोजगाराशी संबधित अनेक उदाहरणे दिली. कोणत्याही ठिकाणी रोजगारासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी युवकांनी स्वतःवर कोणताही गुन्हा दाखल होणार याची काळजी घेणे गरजेचे आहे. असे सांगून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील काही किस्से त्यांनी विषद केले. तसेच रोजगार मेळावा आयोजित केल्याबद्दल महापालिकेचे आभार मानून अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही राबवावेत असेही ते म्हणाले.
रयत विद्यार्थी मंचाचे अध्यक्ष धम्मराज साळवे म्हणाले, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यासोबतच अशा प्रकारचे रोजगार मेळावे देखील आयोजित करणे गरजेचे आहे. या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास हीच महापुरुषांना खरी आदरांजली ठरेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यास पावसाची संततधार सुरु असूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. यामध्ये शहरातील सुमारे ३६० विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. यावेळी जेबीएम , बीव्हिजी, टाटा स्त्रीव्ह , महिंद्रा यांसारख्या २० हून अधिक नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटनिदेशक ज्योत सोनवणे यांनी केले. तर आभार विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी मानले. निदेशक मनोज ढेरंगे यांनी रोजगार मेळाव्यास आलेल्या सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.