शबनम न्युज | पिंपरी
“रमेश पतंगे संघविचाराचे आधुनिक भाष्यकार आहेत!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी मंगळवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् , चिंचवडगाव येथे काढले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित दोन दिवसीय ‘रमेश पतंगे साहित्य संगिती’ समारोहाच्या समारोप सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सदानंद मोरे बोलत होते. रमेश पतंगे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, मधुरा पतंगे, डॉ. नीता मोहिते, प्रा. पूनम गुजर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. मोरे पुढे म्हणाले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेक जण आपल्याच कार्याची आपल्या हाताने हानी अथवा कार्यनाश करून घेतात. या पार्श्वभूमीवर अभ्यासक आणि कार्यकर्ता या दोन्ही आघाड्या पतंगे यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अलीकडच्या पंचवीस वर्षांच्या इतिहासाचे अन् स्थित्यंतरांचे ते साक्षीदार आहेत. समरसता चळवळ हा संघाचा धोरणात्मक निर्णय होता. संविधानातील तरतुदींचा भावी काळात अर्थविस्तार करावा लागेल!” यावेळी रमेश पतंगे यांनी समरसता चळवळीच्या प्रारंभाविषयी माहिती देऊन संघ कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. त्यापूर्वी, सकाळी ‘भारतीय संविधान : आपली दृष्टी’ या विभावरी बिडवे यांच्या अध्यक्षतेखाली चौथ्या परिसंवादात सुनंदा भगत यांनी ‘आपण, आपले संविधान’ या पुस्तकावर भाष्य करताना, “प्रत्येक नागरिकाने संविधानसाक्षर होणे गरजेचे आहे!” असे मत व्यक्त केले.
ॲड. प्रशांत यादव यांनी ‘आपले मौलिक संविधान’ यांविषयी बोलताना “संविधान ही राष्ट्राची गीता आहे म्हणून ते शाश्वत आहे!” असे प्रतिपादन केले; तर प्रा. दिगंबर ढोकले यांनी ‘संविधान : तत्त्वविचार, मूल्ये, ध्येयवाद’ यांवर “संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा आहे!” असे अधोरेखित केले. नरेंद्र पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ‘संस्कृती संस्कारांचा वारसा’ या पाचव्या परिसंवादात श्रीकांत चौगुले यांनी ‘कथामृत’ या पुस्तकाविषयी बोलताना “कथा हा लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे!” असे सांगून कथांचा इतिहास कथन केला. रूपाली कालेकर यांनी पतंगे यांच्या विविध कथांचा विस्तृत आढावा घेतला; तर स्मिता जोशी यांनी लोककथांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला. ‘तथागतांचे विचार’ या उज्ज्वला हातागळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या अंतिम परिसंवादात प्रा. रूपाली भुसारी यांनी ‘तथागत आणि श्रीगुरुजी’ यांच्यातील साम्यस्थळांची मांडणी केली.
मारुती वाघमारे यांनी ‘गांधी समजून घेताना’ या पुस्तकावर भाष्य केले; तर ॲड. राणी सोनवणे यांनी ‘अब्राहम लिंकन ते ओबामा’ या पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवले. दरम्यानच्या काळात मान्यवरांच्या हस्ते शाहीर आसाराम कसबे लिखित ‘आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. स्वप्ना झिरंगे यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. त्यानंतर समीर काळे, ईश्वर काळे, मुकेश भोसले या भटक्याविमुक्त जमातीच्या कार्यकर्त्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. नटराज जगताप यांनी सहभागी मान्यवरांचा परिचय करून दिला. रवींद्र गोळे यांनी सूत्रसंचालन केले. वीर चापेकर यांच्या स्तवनाने सोहळ्याचा समारोप करण्यात आला.