शबनम न्युज | मुंबई
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करण्यात आलं आहे, अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी सरकारवर केली आहे. आज अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्प २०२३ सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये काही वस्तूत वाढ करण्यात आली असून, अनेक वस्तूंच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्प सादर केल्यांनतर आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लबोल केला आहे.
ते म्हणाले, “केंद्रीय अर्थसंकल्पातून काय मिळालं? हा मोठा सवाल आहे. ज्या राज्यात आताच निवडणुका होऊन गेल्या. जिथे भाजपाने १५० हून अधिक जागा जिंकल्या. त्या राज्यात महाराष्ट्रातून वेदान्त फॉक्सकॉन, टाटा एअरबस, फायनान्शिअल सेंटर आदी कंपन्या गेल्या. त्यांना अधिकच्या सवलतीही मिळाल्या आहेत. मला वाटतं डायमंड हबही सुरतला गेलं आहे. पण या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम झालं आहे.”
“मूळ मुद्दा हाच आहे की, राज्यात एवढी ओढाताण करून घटनाबाह्य सरकार स्थापन केलं. तरीही महाराष्ट्राला आणि मुंबईला कुठेतरी दिल्लीसमोर झुकवायचं आणि काहीच द्यायचं नाही, हे आजच्या अर्थसंकल्पात दिसलं,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.