पुणे | शबनम न्यूज
आज सकाळपासून नागरिकांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून चाचणी इशाऱ्यासाठीचा मेसेज येत आहे. याची पूर्वकल्पना नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी असे सांगितले कि, ‘अतिवृष्टीचा इशारा देण्यासाठी हा पॉपअप तयार करण्यात आला आहे… सर्व टेलिकॉम कंपनीतर्फे हा मेसेज करण्यात येतो आहे. काळजी करण्याचे किंवा घाबरून जाण्याचे कारण नाही.’ असे स्पष्टीकरण दिले आहे.
केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे.
पुढे अधीक्षक संजय शिंत्रे म्हणाले, ही संकल्पना नागरिकांच्या हितासाठीच अमलात आणण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जीवित हानीचा धोका वाढत चालला आहे. नागरिकांना अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थिती याची पूर्वकल्पना देण्यासाठी ही चाचणी करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.
आज सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळाने, १०.३१ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला. सध्याचा अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं कोणतंही कारण नाही.