शबनम न्युज | पुणे
“मलाही कधीकधी प्रश्न पडतो की मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीचा वेग १००, दुसऱ्या कुठल्या रस्त्यावर गाडीचा वेग ८० आणि समृद्धी महामार्गावर गाडीचा वेग १५०. एवढी तफावत आहे तिथे. कुठल्या निकषांवर ही वेगवेगळी वेगमर्यादा घालण्यात आली. पण कधीतरी चर्चा निघेल, तेव्हा मी नक्की विचारेन की यामागचं नेमकं गमक काय आहे? लोकांनी नक्की काय समजावं? उद्या कुणी यावर न्यायालयात गेलं, तरी तिथे उत्तर द्यावं लागेल”, असा प्रश्न विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केला.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी सकाळीच नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते जपळपास ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं. समृद्धी महामार्गाचा वाद हा सुरुवातीपासूनच चालू आहे. आज अखेर महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, अजित पवार यांनी यासंदर्भात खोचक टोला लगावला आहे. आज ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे ते म्हणाले, “समृद्धीचं श्रेय घेण्यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये स्पर्धा असेल असं मला काही वाटत नाही. कारण दोघांनी एकत्रच पंतप्रधानांना आमंत्रण दिलं. दोघांनी एकत्रच रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी ड्रायव्हिंगचं काम देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलं होतं. त्यात गाडीचा वेगही १५० पर्यंत होता. गाडी कुणाची वगैरे हा वेगळा विषय आहे”, असं म्हणत अजित पवारांनी या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्र्यांना कोपरखळी मारली.