आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका !
शबनम न्युज | चिंचवड
“आम्ही (महाविकास आघाडी) जिथे जातो,तिथे सभांना मोठी गर्दी होते. विरोधी पक्षनेते अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरातांच्या सभांना मोठी गर्दी होते. परंतु तुम्ही कधी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभांना गर्दी झालेली पाहिली आहे का? तिथेही गर्दी होते, पण फक्त खुर्च्यांची. आमच्या सभेला जनता गर्दी करते तर त्यांच्या सभांना फक्त खुर्च्यांची गर्दी होते.” अशी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेचे (ठाकरे गट) युवा सेनाप्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते पिंपरी चिंचवड शहरात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविकास आघाडीच्या सभेत बोलत होते.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरिता महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची चिंचवडमध्ये सभा झाली. या सभेत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आदित्य ठाकरे प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली.
ते म्हणाले, “मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतचे ४० गद्दार आमदार जातात तिथे ५० खोक्यांची घोषणा होते. ही घोषणा ऐकल्यावर त्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे पोलिसांना पाठवलं जातं. त्यांच्या घरावर धाड पडते. केंद्रीय यंत्रणा त्यांच्या मागे लागते. परंतु राज्यात झालेली ही गद्दारी कोणालाच पटलेली नाही. मुख्यमंत्री आणि ४० आमदारांनी उद्धव साहेबांच्या पाठीत वार केले.म्हणाले की, आतापर्यंत अनेक आमदार, खासदारांनी पक्षाची विचारणी न पटल्यामुळे किंवा कोणत्याही कारणास्तव पक्ष बदलले आहेत. परंतु या नेत्यांनी रीतसर राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. परत निवडणूक देखील लढवली. परंतु जे राज्यात झालंय, तसं राजकारण यापूर्वी कधीही झालं नव्हतं.” असेही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.