शबनम न्युज | मुंबई
शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सोडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे, असा मोठा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नाशिक मध्ये संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राऊत यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत, हे सरकारच बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. हे सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या सरकारचे आदेश पाळू नयेत, असे आवाहन संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे नाशिक पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावर मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, कोणतेही चुकीचे वक्तव्य केले असे वाटत नाही. सामान्य माणसाच्या मनातील कायद्याची चौकटीतील व्यथा व्यक्त केल्या आहेत. पण माझ्यावर दबाव आणला जात आहेत. माझ्यावर काहीही करून माझ्यावर दबाव आणणे, शरण यायला भाग पाडणे, मग शिवसेना सोडायला लावणे, उद्धव ठाकरे यांना सोडायला लावणे, अशा प्रकारची दबाव नीती माझ्यावर केली जात आहे. या दबावाला बळी पडणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच महाराष्ट्रातील सरकार संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहेत, ज्याला तुम्ही सत्ता संघर्ष म्हणतात, त्यावरून या सरकारमध्ये अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे, हे स्पष्ट झाले आहे. असे संजय राऊत म्हणाले. तसेच गुन्हा दाखल झाला असला तरी मी त्या कारवाईला सामोरे जाईल.