पीसीईटीच्या वतीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘दहावी नंतरची शाखा निवड’ पुस्तक भेट
शबनम न्युज | पिंपरी
इयत्ता दहावीचा टप्पा यशस्वीपणे उत्तीर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीची शाखा, विषय यांची निवड करावी. त्याबरोबरच कष्ट आणि जिद्दीने परिश्रम करण्याची तयारी ठेवली तर यशाच्या राजमार्गावर यशस्वी घोडदौड करता येईल, असा कानमंत्र करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चाफेकर माध्यमिक विद्यालय, केशवनगरच्या इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी विवेक वेलणकर यांनी उपस्थित विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी एस. बी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम वडजे, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एस.एन. पाटील, एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे प्लेसमेंट अधिकारी प्रा. स्वप्नील सोनकांबळे, चाफेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास चपटे, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद वैद्य, पर्यवेक्षिका मोमीन मॅडम, एस. डी. जाधव, एस. यु. जाधव, आव्हाड मॅडम, शिंदे सर, रामेश्वर पवार आदी उपस्थित होते.
यावर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधून १९५० विद्यार्थी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना दहावी नंतर करीअर कसे व कोणते निवडावे याचे मार्गदर्शन करणारे विवेक वेलणकर यांनी लिहिलेले ‘दहावीनंतरची शाखा निवड’ हे पुस्तक पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने भेट म्हणून देण्यात आले. या पुस्तकात पारंपारीक कोर्सेस बरोबरच आयटीआय , डिप्लोमा इंजिनिअरींग पासून फाईन आर्टस्, नर्सिंग, व्होकेशनल कोर्सेस पर्यंतची सविस्तर माहिती आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना शाळेतून बोर्डाच्या मार्कलिस्ट सोबत देण्यात आले. या निमित्त चाफेकर माध्यमिक विद्यालय केशवनगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या शाळेचा या वर्षीचा इयत्ता दहावीचा निकाल ९४.२१ टक्के लागला आहे. महापालिका बक्षीस योजनेत शाळेतील निलेशकुमार पांडे, लालचंद बोईनवाड, पवन साळवे, सायली जगताप, अमिना शेख, प्रज्ञा नखाते हे विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले. त्यांना प्रत्येकी पंचवीस हजारांचे बक्षीस मिळाले असून याचा शाळेला सार्थ अभिमान आहे, असे मुख्याध्यापक रामदास चपटे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
दहावी, बारावी नंतर पुढील शिक्षण घेताना आवडीचे विषय, शाखेची निवड करा. अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखा याबरोबरच काही व्यवसायिक अभ्यासक्रम आहेत. अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन रोजगार संधी उपलब्ध होतात आणि पुढील शिक्षण घेण्यास मदत होते, असे प्राचार्य एस. एन. पाटील यांनी सांगितले.
सूत्रसंचालन रामेश्वर पवार यांनी केले. लक्ष्मी कर्डीले यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.