मुंबई , प्रतिनिधी : शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्त ठाण्यातल्या टेंभी नाका येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वर्षभरापूर्वी (महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळात) शिवसेना आणि भाजपाच्या गोटात काय घडलं याबाबत बरीच माहिती उलगडून सांगितली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात राज्यातल्या जनतेचं जगणं असहाय्य झालं होतं. लोकांचा श्वास गुदमरू लागला होता. आपल्या आमदारांचा श्वास गुदमरू लागला होता. आपले शिवसेनेचे सगळे आमदार, त्यांच्या भावना, त्यांच्या मतदार संघातले विषय, महाविकास आघाडीत होणार त्रास सहन करत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होता खरा, परंतु राज्यात शिवसेनेचं आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होत होतं. त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचं, शिवसेनेच्या आमदारांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी मला त्यावेळी भलतंच धाडस करावं लागलं. ते धाडस सोपं नव्हतं. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात, शिवसैनिकांच्या मनात, आमदारांच्या मनात जे काही घडत होतं, या सगळ्यांचा मनात जो उद्रेक होता त्याला वाचा फोडण्याचं काम त्यावेळी या एकनाथ शिंदेने केलं. हे धाडस संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने, देशाने आणि जगानेही पाहिलं आहे.