शबनम न्युज | पिंपरी
दिवाळीचा सण अवघ्या तीन दिवसांवर आला असताना शहरातील लाभार्थ्यांना अद्याप आनंदाचा शिधा मिळालेला नाही. शासनाकडून रेशन दुकानदारांना सुरूवातीला फक्त साखर, मैदा आणि तेल अशा तीनच गोष्टी वितरीत झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला असून चनाडाळ, रवा आणि पोहे तत्काळ उपलब्ध करून लाभार्थ्यांना वाटप करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केली आहे.
याबाबत काळभोर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिवाळीनिमित्त अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाच्या वतीने अंत्योदय अन्न योजना आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या नागरिकांना गतवर्षीप्रमाणे यंदाही आनंदाचा शिधा 100 रूपयांमध्ये देण्याची घोषणा केली आहे. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे 4 जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचाही समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल महायुती सरकारचे आपण अभिनंदन करतो. सरकारच्या या निर्णयामुळे शहरातील गोर-गरीब नागरिकांची दिवाळी गोड होणार आहे. मात्र, दिवाळी अवघ्या तीन दिवसांवर आली असताना शहरातील विविध भागातील रेशन दुकानदारांकडे फक्त साखर, मैदा आणि तेल अशा तीनच गोष्टी वितरीत झाल्या आहेत. त्यामुळे सरकारने उर्वरित वस्तूंचे रेशन दुकानदारांना तत्काळ वितरण करून नागरिकांना दिवाळीपूर्वी सर्व वस्तू कशा मिळतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.
याबाबत विशाल काळभोर म्हणाले, आनंदाचा शिधा या संचात 1 किलो साखर, 1 लीटर खाद्यतेल, प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा देण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड होणार आहे. मात्र, यामधील काही वस्तू आल्या आहेत तर काही वस्तू आल्या नाहीत. त्यामुळे पिंपरी आणि भोसरीतील अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून वस्तू रेशन दुकानदारांना उपलब्ध करून द्याव्यात. वस्तू आल्यानंतर दुकानदारांनी वेळ न घालवता तत्काळ वितरित कराव्यात, असेही काळभोर म्हणाले.
दरम्यान, दोन दिवसात सर्व वस्तू उपलब्ध करून वाटप सुरू करण्यात येणार असल्याची माहिती निगडी परिमंडळच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.