शबनम न्यूज , पिंपरी चिंचवड :
मानिनी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा भारतीताई चव्हाण यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य वतीने महा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मुलांच्या नावापुढे आईचे नाव लावणे या चळवळीच्या भारतीताई चव्हाण या जनक आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून यापुढे ज्याप्रमाणे वडिलांचे नाव मुलाच्या किंवा मुलीच्या नावापुढे लावले जात असे आता आईचेही नाव लावले जाणार आहे. याबाबत राज्य शासनाने मान्यता दिली असून यासाठी भारतीताई चव्हाण यांनी लढा उभारला होता..
भारतीताई चव्हाण यांनी आपल्या मानिनी फाउंडेशनच्या अंतर्गत अनेक सामाजिक कार्य उभारली आहेत त्यांच्या कार्याची कमान दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यातच आता एक मानाचे पान जोडले जाणार आहे. अशा शब्दात राज्यस्तरीय कार्यकारणी आणि विभागीय गुणवंत कामगार कल्याण मंडळ पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने भारतीताई चव्हाण यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
महिला सक्षमीकरण साठी जागतिक पातळीवर सुरू करण्यात आलेले प्रयत्न मानिनी फाउंडेशन, भारत गौरव फाउंडेशन, हार्मनी इंटरनॅशनल वूमन फाउंडेशन ,राष्ट्रीय उद्यामशीलता आणि औद्योगिक विकास मंडळ अँटिकोरोना टास्क फोर्स, गुणवंत कामगार कल्याण मंडळ अशा विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या भारतीताई चव्हाण यांचे कार्य दैदीप्यमान आहे. कोरोना संकटकाळात भारतीताई चव्हाण एखाद्या योध्या प्रमाणे पिढीतांसाठी आणि गरजवंतांसाठी कार्य करत होत्या.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांचे दुसरे राज्यस्तरीय महाअधिवेशन कोल्हापूर येथे 29 जानेवारी रोजी संपन्न होत आहे .या अधिवेशनात भारतीताई चव्हाण यांना महा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व खासदार श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर भारतीताई चव्हाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.