शबनम न्युज | पुणे
आता लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज भरणे देखील सोपे राहिलेले नाही. यासाठी मोठी कसरत करावी लागते. वारंवार कागदपत्रांची जुळवाजुळन करावी लागते. यंदाच्या निवडणुकीत त्यात आणखी एका प्रमाणपत्राची भर पडली आहे. आता उमेदवारांना शासकीय निवासस्थानाचे नादेय प्रमाणपत्र ( (नो ड्यूज सर्टिफिकेट) सुद्धा सादर करावे लागणार आहेत.
निवडणुकीसाठी उमेदवार इच्छुकांनी एक महिन्यापासून विविध कागदपत्रे प्रमाणपत्रे संकलित करणे सुरू केले आहे. प्रस्थापित नेते आर्थिकदृष्ट्या सक्षम इच्छुकांनी यासाठी दोन ते चार वकिलांची सेवा घेत आहेत. उमेदवारी अर्ज अचूक भरणे म्हणजे मोठी कसरत असते. यात थोडी चूक म्हणजे अर्ज बाद होण्याची शक्यता राहते, यामुळे बहुतेक उमेदवार अगदी चार अर्ज सादर करतात.
अर्ज भरण्याची वेळ सकाळी ११ते दुपारी ३ राहणार आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवार साठी एक तर इतर पक्ष व अपक्षासाठी १० प्रस्तावक आवश्यक आहे. २३ जानेवारी ‘२४ ला प्रसिध्द अंतिम मतदार यादीत त्यांची नावे असणे अनिवार्य आहे. बाहेरच्या उमेदवाराला आपल्या मतदारसंघातील मतदार यादीची प्रमाणित प्रत जोडावी लागते. अर्जासोबत जोडावयाचे शपथपत्र आयुक्त, प्रथमश्रेणी दंडाधिकारी वा नोटरी समोर शपथबद्ध करण्याचे निर्देश आहे. पक्षाचा ‘एबी फॉर्म’ अर्ज भरताना किंवा अर्जाच्या अंतिम दिनांकला दुपारी ३ पर्यंत सादर करता येईल. अनामत रक्कम खुल्या प्रवर्गासाठी २५ तर अनुसूचित जाती जमातीसाठी १२ हजार ५०० असून ती रोखीनेच भरावी लागणार आहे. अर्जासोबत २ बाय २.५ सेमी आकाराचेच साध्या वेशातील छायाचित्र जोडावे लागणार आहे. उमेदवार वा प्रतिनिधीचे नावे स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक असून ते अर्ज भरण्याच्या किमान एक दिवस अगोदर काढलेले असावे. या खात्यात निवडणूक वगळता इतर व्यवहार करता येत नाही. १० हजार पेक्षा जास्तीचे व्यवहार चेक वा आरटीजीएस ने करणे अनिवार्य आहे. दैनंदिन खर्च सादर करणे व निकालापासून ३० दिवसांत अंतिम खर्च देणे आवश्यक आहे.