शबनम न्युज | पुणे
कमी मतदान असलेला जिल्हा किंवा मतदार संघस्तरावर स्वीप कार्यक्रम मर्यादित न ठेवता कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचून तेथील मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, असे निर्देश प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.
यशदा येथे आयोजित स्वीप नोडल अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, आयोगाच्या वरीष्ठ स्वीप सल्लागार अनुराधा शर्मा आदी उपस्थित होते.
चोक्कलिंगम म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या भूमिका सुरुवातीच्या काळातील नियंत्रक, अंमलबजावणी करणारी संस्था ते आता मतदान जनजागृतीपर्यंत विस्तारल्या आहेत. निवडणूक आयोग जनजागृतीसाठी आता मतदान कमी असलेल्या राज्यापर्यंतच नव्हे तर कमी असलेल्या शहरांपर्यंत पोहोचला आहे. आता सर्वांना मिळून कमी मतदान केंद्रापर्यंत पोहोचून तेथे ९० टक्क्याहून अधिक मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
ते पुढे म्हणाले, संविधाननिर्मितीनंतर मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळाला. युरोपातील काही देशांच्या आधीच संविधानाने आपल्याला मताचा अधिकार दिला. या पार्श्वभूमीवर सुशिक्षित नागरिकांच्या मतदानाप्रती उदासीनतेमुळे शहरात कमी मतदान होत आहे. शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विविध प्रयत्न होत असून राज्यात मुंबई, पुणे, ठाणे या शहरात गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये १५१ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.