शबनम न्युज | पुणे
‘संगीताने वैरभाव विसरून प्रेम भाव निर्माण होतो, निरपेक्ष भक्तीने गायन करणाऱ्या भक्ताचे गायन ऐकण्यासाठी देव ही वाट पहातो आणि संगीतात देहभाव विसरून स्वस्वरूपासी प्राप्त होण्याची अद्भुत शक्ती आहे,हे संगीतज्ञ तुकोबांच्या अभंगातून सिद्ध होते‘, असे प्रतिपादन पं. यादवराज फड यांनी केले. संत तुकाराम महाराज विचार व्यासपीठाने गांधी भवन कोथरुड येथे तीन दिवसीय ‘तुका झालासे कळस‘ या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या सांगतेला तुकोबांचे सांगितिक योगदान या विषयावर ते बोलत होते.
पं. यादवराज फड यांनी गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी | भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त | लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष | सेवू ब्राह्मरस आवडीने || इत्यादी प्रमाणांचा आढावा घेऊन तुकोबांचे सांगितिक योगदान स्पष्ट केले.सीताराम बाजारे यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगांचा दाखला देत त्यांचे विचार भेदाभेद, विषमता नष्ट करणारे, अनिष्ठ प्रथा परंपरांवर आघात करणारे, समाजाला समानतेकडे नेणारे होते यावर भाष्य केले. तुकाराम महाराजांच्या विचारांचा धागा महात्मा फुले, महात्मा गांधी, विनोबा भावे, रविंद्रनाथ टागोर आदींनी घेतला. त्यांच्या अभंगाचे २५ हून अधिक भाषात भाषांतर झालेले आहे. ८० हून अधिक देशात त्यांच्या विचाराचा प्रसार झाला आहे. त्यामुळे खरच ते जगदगुरु ठरतात.
हभप चंद्रकांत महाराज वांजळे, डॉ. चैतन्य कुंटे, हभप रामशास्री पालवे, जितेंद मैड, प्रा. दत्ता शिंदे, बबाबाई लायगुडे, अंजना शेडगे, कुसुम सोनवणे, लीलाबाई कांबळे, चिंतामण उतळे यांनी या मंथन कार्यक्रमात आपले विचार मांडले. संत तुकाराम महाराजांचे अभंग समाजमनात तरले त्यामध्ये मौखिक परंपरेचा मोठा वाटा आहे. मौखिक परंपरेतून दिसणारा सामाजिक इतिहास अनेक ऐतिहासिक घटनावर प्रकाशझोत टाकतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष नको. असे मत मौखिक परंपरेचे अभ्यासक जितेंद्र मैड यांनी व्यक्त केले. फड यांच्या गायनाला तबला – अविनाश पाटील, हार्मोनियम – अमोल मोरे, टाळ – आनंद टाकळकर स्वरसाथ सुनील पासलकर यांनी साथ केली.
सुत्रसंचालन अँड. शिवाजी भोईटे यांनी केले. स्वागत प्रा. सागर शेडगे यांनी केले. आभार अनंत सुतार यांनी मानले. दिलीप चोरघे, सचिन धनकुडे, बाबाजी वाघ, डॉ. संदीप बुटाला, शाम देशपांडे, तान्हाजी निम्हण आदी उपस्थित होते.