शबनम न्युज | पिंपरी
संशोधनाच्या सहकार्याने धोरणात्मक बदल व्हायला हवेत, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ.पराग काळकर यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने ‘व्यवस्थापनातील नाविन्यता आणि माहिती तंत्रज्ञान’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना बोलत होते. तंत्रज्ञान कितीही विकसित तंत्रज्ञानामुळे माणसांची जागा यंत्रे घेऊ लागले आहेत असे असताना नाविन्यतेचा दृष्टिकोन असणाऱ्यांनाच या तीव्र स्पर्धेत टिकता येईल, असे काळकर यांनी सांगितले. विविध उदाहरणांद्वारे त्यांनी बदलत्या जागतिक परिस्थितीबद्दल भाष्य करीत संशोधनाचे महत्व केवळ पेंटन्टपुरते मर्यादित न ठेवता प्रक्रिया, किंमती,
माणसे आणि धोरण निर्मितीमध्ये संशोधनाचा सहभाग व्हायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या परिषदेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मलेशियाचे प्रेरदाना विद्यापीठ, नेपाळच्या पोखरा विद्यापीठाचे मुनि ग्लोब कॉलेज, मलेशियाचे म्हासा विद्यापीठ आणि इंडो युरोपियन एज्युकेशन फाउंडेशन मधील व्याख्याते, संशोधक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
यावेळी आयआयएमएसचे संचालक डॉक्टर शिवाजी मुंढे, यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, हिताची एस्टिमो ब्रेक सिस्टम्स इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक अनिल खांडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधन पार्क फौंडेशनच्या समर्थ उद्यम तंत्रज्ञान फोरमचे संचालक डॉ.सदाशिव पाधी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या परिषदेत देश परदेशातील १३० संशोधन प्रबंध सादर करण्यात आले.
या परिषदेच्या पहिल्या दिवशी मलेशियाच्या प्रेरदाना विद्यापीठाचे प्रा.डॉ. सीरियाक देवासिया, नेपाळच्या पोखरा विद्यापीठाचे डॉ.गंगाधर दहाल,हिताची एस्टिमो ब्रेक सिस्टम्स इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक अनिल खांडेकर,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधन पार्क फौंडेशनच्या समर्थ उद्यम तंत्रज्ञान फोरमचे संचालक डॉ. सदाशिव पाधी, ब्रेम्बो ब्रेक इंडिया कंपनीचे कण्ट्री हेड एच.आर.किशोर केंचे, मॉरिशसच्या ला सेंटीनेले ग्रुपचे सीईओ आरिफ सालारू, एम्डॉक्स चे वरिष्ठ तंत्रज्ञान व्यवस्थापक अनिल कुमार सिंग यांची व्याख्याने झाली. तर द्वितीय सत्रात संशोधन प्रबंधांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच परिषदेच्या समारोप सत्रात आयआयएमएस च्या एमबीए व एमसीए विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीसाठी
प्रशस्तीपत्र व बक्षिस देऊन गौरवण्यात आले.हा बक्षीस वितरण समारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शंतनुराव किर्लोस्कर अध्यासनाचे माजी प्रमुख आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी प्राध्यापक कॅप्टन डॉ. सी. एम. चितळे यांच्या हस्ते करण्यात आले.