डॉ. माशेलकर यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेकानेक उदाहरणे देत विकसित भारताची प्रतिमा श्रोत्यांसमोर उभी केली. ते म्हणाले, ‘तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून आपण उत्पन्नाच्या पातळीवरील असमानता दूर करू शकतो. आपल्या युवा पिढीने समाजातील तळागाळाच्या हिताचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपण धर्म, जात, भाषा, वंशाच्या नावावर विभाजित होत असल्याचे चित्र आहे. पण आपण प्रत्येकाने जातीमुक्त भारताचे स्वप्न पाहिले पाहिजे. स्वातंत्र्याच्या शताब्दीवर्षांतला भारत हा सुसंस्कृत, सुशिक्षित, सुरक्षित, समृद्ध आणि स्वानंदी असावा, असे मला वाटते’.
डॉ. भटकर यांनी जयंतराव सहस्रबुद्धे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘जयंतराव सर्वसामान्यांच्या सेवेसाठी समर्पित होते. त्यांची विज्ञानाकडे पाहण्याची दृष्टी निराळी होती. त्यांचे समाजासाठीचे योगदान अविस्मरणीय होते, त्यांनी दिलेली दृष्टी आणि दिशा पकडून आपण काम केले पाहिजे’, असे भटकर म्हणाले.