शबनम न्यूज : पुणे (दि.२७ मार्च) :- भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच ‘माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ या संकल्पेनवर मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली असून स्पर्धेची प्रवेशिका दाखल करण्यास ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहेत. किमान एक प्रकारच्या स्पर्धेत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. प्राध्यापक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने ‘माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ या मध्यवर्ती संकल्पनेवर पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेत ई-प्रमाणपत्रापासून रूपये 2 लाखापर्यंत आकर्षक अशी बक्षिसेही जाहीर केली आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाचे बंधन नसल्याने भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी https://ecisveep.nic.in/contest/ या संकेतस्थळावर नोंदणी करून त्यांच्या प्रवेशिका voter-contest@eci.gov.in या ई-मेलवर कराव्यात, असे जिल्हा निवडणूक शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.