शबनम न्युज | मुंबई
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई व महाराष्ट्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा महाराष्ट्रात निषेध व्यक्त केला जात आहे. यांनतर आता शिवसेना पक्ष नेते उद्धव ठाकरे यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. कोश्यारी यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान केला आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. तसेच त्यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे, असा हल्ला चढवला. ते शनिवारी (३० जुलै) मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या दोन-अडीच वर्षांच्या काळात सुंदर लेण्या, शिवरायांचे गड-किल्ले व इतर सर्व चांगल्या गोष्टी पाहिल्या असतील. मात्र, आता त्यांना कोल्हापुरचा जोडा दाखवण्याची देखील वेळ आली आहे. कारण कोल्हापुरी जोडा हेही महाराष्ट्राचं वैभव आहे. त्याचा अर्थ कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, जगप्रसिद्ध कोल्हापुरी जोडे कोश्यारींना दाखवण्याची वेळ आली आहे.”