शबनम न्युज | पुणे
शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव आळंदी, पुणे या ठिकाणी पर्यावरण विभागा अंतर्गत ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि कु.पायल घोडके हिच्या स्वागत गीताने झाली.पाहुण्यांचा परिचय प्रा. कैलास अस्तरकर यांनी करून दिला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व व्याख्याते प्रा. परमेश्वर भत्ताशे- इतिहास विभाग प्रमुख यांनी ५ जून १९७२ पासून संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट करून आधुनिक काळात पर्यावरणाच्या संरक्षणाची व संवर्धनाची कशी आवश्यकता आहे हे विविध उदाहरणासह स्पष्ट केले तसेच पर्यावरणाच्या ऱ्हासाला व्यक्ती कसा जबाबदार आहे. यासंदर्भात मत मांडून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पथयात्रा, हरित सोहळे, निबंध व पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम यासारख्या महत्त्वपूर्ण मोहिमेची आवश्यकता स्पष्ट केली. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आज प्रत्येक तरुणाने आपले योगदान देणे किती महत्त्वाचे असून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडे तोडण्यापेक्षा झाडे लावायला शिकले पाहिजे असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे “या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत वृक्ष व पशुपक्षी आपले सगेसोयरे असून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची आवश्यकता व्यक्त केली. ” पर्यावरणाचे ठेवूया ध्यान, तेव्हाच बनेल भारत देश महान ” या घोषवाक्या प्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिकांनी पर्यावरण सुरक्षित ठेवण्याचा मंत्र जपण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच भारत देश हा जगातील महान देश असेल अशी आशा व्यक्त केली. पर्यावरण ही संकल्पना कोणत्या एका व्यक्तीची नसून तिच्याशी प्रत्येक व्यक्तीचा जिव्हाळ्याचा, प्रेमाचा संबंध असून पर्यावरण संरक्षण व संवर्धन काळाची गरज आहे हे विविध उदाहरणासह स्पष्ट केले. आपण दररोज ईश्वराची पूजा करतो हा ईश्वर, नारायण म्हणजेच पर्यावरण असून त्याची हानी करण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर निश्चितच आपली जीवित हानी होऊ शकते असे मत व्यक्त करीत पर्यावरण वाचले तरच जग वाचेल असा विद्यार्थ्यांना संदेश दिला.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपाली सोनवणे यांनी केले व प्रास्ताविक प्रा. सविता मानके यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. यशोदा खुळखुळे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. पांडुरंग मिसाळ,प्रा. संजीव कांबळे, प्रा. माणिक कसाब, प्रा. शाहूराज येवते, प्रा. डॉ. रणजीत कदम प्रा.डॉ. राजू शिरसकर , प्रा. विकास दिघे, प्रा. दिलीप बारी, प्रा. विश्वनाथ व्यवहारे,प्रा. सोनाली तापकीर इत्यादी विभाग प्रमुख व सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.